केंद्रीय मंत्री गिरिराज यांचा दावा ः बंगालच्या वाटेवर बिहार
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील दंगलींप्रकरणी केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. बिहार आता बंगालचे अनुकरण करत आहे. सासाराम अन् बिहारशरीफमध्ये पलायन होत आहे. बहुसंख्याक समुदायाला पलायन करावे लागत असताना राज्य सरकार खोटं बोलत असल्याचा आरोप गिरिराज यांनी केला आहे.
नालंदा अन् सासाराममध्ये बहुसंख्याकांना घरदार सोडून पलायन करावे लागत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा गृहजिल्हा असलेल्या ठिकाणीच बहुसंख्याक संकटात आहेत. बिहार सरकारला रामनवमीच्या दिनी शोभायात्रा काढली जाणार याची कल्पना नव्हती का? बिहार सरकारने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कुठलीच पावले उचलली नाहीत असा दावा केंद्रीयमंत्र्यांनी केला आहे.
बिहार सरकार अन् मुख्यमंत्री नितीश कुमार दोघेही अपयशी ठरले आहेत. तसेच राज्यातील गुप्तचर यंत्रणांचेही हे अपयश आहे. रामनवमीनिमित्त काढल्या जाणाऱया शोभायात्रेवर हल्ले करण्यासाठी दगड जमविले जात होते. याची माहिती पोलिसांकडे तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडेही नव्हती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दंगलींची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी गिरिराज यांनी केली आहे.
बिहारमध्ये नालंदा, मुजफ्फरपूर, मुंगेर अन् गया या जिल्हय़ांमध्ये हिंसा झाली आहे. नालंदामध्ये झालेल्या हिंसेत एकाला जीव गमवावा लागला आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आल्यावर स्थिती नियंत्रणात येऊ शकली.