पुणे / प्रतिनिधी :
संजय राऊत यांना फार गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही. तुरुंगात जावे लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राऊत यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोंदीवरील टीकेला उत्तर दिले.
पाटील म्हणाले, आजही सर्वांनी मोदींना जगातील सर्वात सर्वोच्च नेते म्हणून गौरविले आहे. मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देश वेगाने प्रगती करत आहेत. आपली गंगाजळी म्हणजे परकीय चलन सुधारले आहे. इंग्लंडला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. हे जगाला माहिती आहे. अनेक देशांनी रुपयात व्यवहार करण्यास मान्यता दिली. या सर्व गोष्टी सर्वसामान्य माणसाला कळतात. ते व्यवस्थित वर्तमानपत्र वाचतात, टीव्ही पाहतात. मात्र, तरीही पंतप्रधानांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. फडणवीस त्यांना उत्तर लिहिण्यास सक्षम आहेत. देवेंद्र फडणवीस कधीही कुणाला भेट देणे टाळत नाहीत. विधिमंडळाचे अधिवेशन मोठा काळ चालले. इतिहासात पहिल्यांदा इतके दिवस अधिवेशन चालले. त्यामुळे फडणवीसांनी व्यग्र दिनक्रमात वेळ दिला नसेल. संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला गांभीर्याने घ्यायचे नसते, असा चिमटाही त्यांनी काढला.