पुणे : राजकारणात हुकूमशाही वाढत आहे. मात्र, राजकारणात वा राजकीय पक्षात ती असता कामा नये. एकत्र येऊन निर्णय घेणे सध्याच्या काळात खूपच आवश्यक असल्याचे मत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.
जितो पुणे (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) च्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मिलिंद फडे यांना लाईफ टाईम ऍचिव्हमेंट अवार्ड देण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ एस.के. जैन, जितोचे चेअरमन राजेशकुमार सांकला, व्हाईस चेअरमन विजय भंडारी व अन्य उपस्थित होते.
सामंत म्हणाले, आत्ताच्या काळात गांधींजींच्या अहिंसा मार्गावर चालायाला हवे, मात्र, तसे कुठेही पहायला मिळत नाही. मागे मी ऐकले, की पुण्यात कोयता गॅंगची मोठी दहशत आहे. कोयता गॅंगला ठोकून काढा, असे मी पोलिसांना जाता-जाता सांगणार आहे. अशा प्रकारे दहशत करणे, लोकशाहीला घातक आहे. एकत्र येऊन निर्णय घेणे, साध्याच्या काळात खूपच आवश्यक आहे. राजकारणात हुकूमशाही वाढत आहे. लोकशाही राजकीय पक्षात असती, तर आम्हाला गुवाहाटीला जावे लागले नसते, असेही त्यांनी सांगितले.
जैन समाजाच्या चार संघटना एकत्र येऊन चांगले काम करत आहेत. राजकारणात असे घडणार नाही. त्याचे परिणाम आपण पहाताच आहोत. सकाळी उठून टिव्ही लावला की, शिविगाळ करायचा शो लागतो, अशी टिप्पणी करीत सामंत यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली.
परदेशी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी दुबईला कॉन्फरन्स
उद्योग आता नाही, मागेच गेले. उद्योजकाला जागा देण्याआधीच सीएसआर मागितला जाई. 2 टक्के सीएसआर देणे, उद्योजकाचे कर्तव्य आहे. मात्र, उद्योग उभा राहायच्या आधीच सीएसआर मागणे, चुकीचे आहे. माझे म्हणणे आहे, की सीएसआर देताना सरकारला विचारू नका. मात्र, समाजाचे चांगले काम होईल, तेथे सीएसआर द्या. तसेच, परदेशी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही दुबईला कॉन्फरन्स घेणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
अधिक वाचा : पुढच्या वेळी काळजी घेऊ
या वेळी एस. के. जैन म्हणाले, नोकरी मिळविणारे विद्यार्थी देण्यापेक्षा, नोकरी देणारे विद्यार्थी घडवणारी संस्था महत्वाची आहे. अशा संस्थांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. काम करताना समाज भावना, राष्ट्र भावना असणे आवश्यक आहे.