‘सीआयएसएफ’ला ई-मेल मिळाल्यानंतर सतर्कता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील चार विमानतळांवर बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिल्याने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोलकाता, जयपूर विमानतळासह देशातील चार वेगवेगळ्या विमानतळांवर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा ई-मेलद्वारे करण्यात आला होता. यानंतर विमानतळ सुरक्षा कर्मचारी आणि बॉम्ब निकामी पथकाने शोधमोहीम राबवली. सायबर टीमही घटनास्थळी पोहोचली होती. बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी मिळताच विमानतळ प्रशासनात खळबळ उडाली. सदर माहिती मिळताच विमानतळांवर कसून चौकशी केल्यानंतर ही धमकी अफवा असल्याचे निष्पन्न झाले.
धमकीसंबंधीचा ई-मेल 26 एप्रिल रोजी प्राप्त झाला असून त्यामध्ये देशातील चार वेगवेगळ्या विमानतळांवर बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता, असे सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळालाही बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सर्वत्र घबराट पसरली होती. शुक्रवारी दुपारी विमानतळाच्या अधिकृत फीडबॅक आयडीवर धमकीचा ई-मेल आला. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचे ई-मेलमध्ये म्हटले आहे. ‘मी बेंगळूरमध्ये बसलो आहे, जमल्यास मला पकडा.’ असा उल्लेखही सदर ई-मेलमध्ये आहे. गेल्या चार महिन्यांतील अशा प्रकारची ही तिसरी धमकी आहे.