पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन, कार्याला आरंभ
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय भाषांमध्ये आणि सोप्या पद्धतीने कायदे लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. येथील विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषदेला शनिवारी प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सरन्यायाधींश धनंजय चंद्रचूड यांच्याशी त्यांनी संवादही साधला. सरकारच्या प्रयत्नांची माहिती त्यांनी परिषदेत दिली.
या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. कायदे ज्या भाषेत असतात आणि न्यायालयांमध्ये ज्या भाषेत कामकाज होते. त्यांचा न्यायदानाच्या प्रक्रियेवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे सोप्या भाषेत कायदे असणे आवश्यक आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
दोन संच तयार करणार
प्रत्येक कायद्याचे दोन संच तयार करण्यात येतील. एक संच विधीज्ञांसाठी असेल तर दुसरा संच सर्वसामान्यांसाठी असेल. त्यामुळे सर्वसामान्यांनाही कायदा वाचून त्याचा अर्थ लावणे शक्य होईल. सर्वसामान्य माणसाला कायदा त्याचा स्वत:चा वाटेल अशा प्रकारे त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. विधी विभागाला तशी सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी भाषणात स्पष्ट केले.
आपण कायद्याचे संरक्षक
प्रदीर्घ काळापासून विधीज्ञ आणि न्यायाधीश यांनी कायद्याच्या संरक्षकांची भूमिका साकारली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे सर्व नेते विधीज्ञ होते. ही परिषद एका विशिष्ट पार्श्वभूमीवर होत आहे. भारताने नुकतेच महिला आरक्षण विधेयक संमत केले आहे. या ऐतिहासिक पावलापाठोपाठ या परिषदेचे आयोजन होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अनेक क्रांतीकारक परिवर्तने अनुभवली आहेत. महिला आरक्षण विधेयक भारताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला नवी दिशा देण्यास सक्षम आहे. 2047 पर्यंत भारत महासत्ता व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न होत असून हे लक्ष्य पार केले जाईल असा आमचा आत्मविश्वास आहे, असेही प्रतिपादन या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी केले.
नि:पक्षपाती न्यायाची भूमिका महत्वाची
भारताच्या जडणघडणीत नि:पक्षपाती न्यायाची भूमिका महत्वाची आहे. ही व्यवस्था नसेल तर देशाचे समाजकारण विस्कटून जाण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने न्यायव्यवस्थेत परिवर्तन केले असून त्याचे सुपरिणाम आता दिसून येत आहेत, ही बाबही त्यांनी भाषणात अधोरेखित केली.