मृत हत्तरगी, कब्बूर येथील रहिवासी
प्रतिनिधी / संकेश्वर
महामार्ग ओलांडणाऱया दोघांना दोन वेगवेगळय़ा अज्ञात वाहनांनी जोराची धडक दिली. यात दोघेहे जागीच ठार झाले. हे दोन्ही अपघात बुधवार 15 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हत्तरगी वीरभद्र मंदिरानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडले. राहुल शिवाजी गोंधळी-सुगते (वय 25, रा. कब्बूर) व करीनाईक इराप्पा गुरव (वय 47, रा. हत्तरगी) अशी मृतांची नावे आहेत.
या अपघात संदर्भात समजलेली माहिती अशी, राहुल हा बेळगावहून संकेश्वरकडे जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला. यावेळी मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. राहुल गोंधळी-कब्बूर, किरण शिंदे-नागरमुन्नोळी व विशाल मुगळखोड-बेल्लद बागेवाडी हे तिघे एका दुचाकीवरुन बेळगावला गेले होते. बेळगावमधून विशाल हा बेंगळूरला जाणार असल्याने त्याला बसला बसवून राहुल व किरण दोघे दुचाकीने हत्तरगी बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर पोहचले.
यावेळे राहुलने किरण याला हत्तरगी येथे माझे पाहुणे आहेत. सध्या रात्र झाली आहे. मी हत्तरगी येथे थांबून सकाळी कब्बूरला जातो, तू दुचाकी घेऊन जा, असे सांगितले. यामुळे किरण याने राहुलला महामार्गावर सोडून तो आपल्या गावी निघाला. दरम्यान राहुल हा महामार्ग ओलांडत असताना बेळगावकडून भरधाव येणाऱया अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. यात राहुलचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलीस स्थानकात झाली आहे.