नगराध्यक्ष समीर नलावडेंचे सतीश सावंत, संदेश पारकर यांच्या टिकेला प्रत्युत्तर
वार्ताहर / कणकवली:
कणकवलीतील हायवेच्या निकृष्ट कामाबाबत आम्ही सुरुवातीपासूनच आवाज उठविला होता. समस्या सुटत नसल्याने जनभावना म्हणून चिखलफेक आंदोलनाचा प्रकार घडला होता. कार्यालयात बसून पत्रकार परिषदा घेत आमदार नीतेश राणेंवर आरोप करण्यापेक्षा सतीश सावंत व संदेश पारकर यांनी रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करून दाखवावे. निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्येतून ते दोघेही आमदार राणे यांच्यावर टीका करत असल्याचे प्रत्युत्तर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले आहे.
येथील नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेत नलावडे बोलत होते. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, शिशीर परुळेकर, बंडू गांगण आदी उपस्थित होते.
अर्ध्या तासांत पारकरांची भूमिका कशी बदलली?
चिखलफेक आंदोलनावेळी नारायण राणेंसोबत असतानाही सतीश सावंत हे नीतेश राणेंनी जनतेच्या समस्यांसाठी आवाज उठवला, तेव्हा लपून बसले होते. बॉक्सेल ब्रिजचा भाग कोसळल्यानंतर तेथे आमदार राणेंनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणाऱया संदेश पारकर यांना अर्ध्या तासाने राणे यांच्यावर आरोप करण्याचा साक्षात्कार कसा झाला? अर्थपूर्ण तडजोडीचे आरोप करत असताना सावंत व पारकर हे दोघे त्यातील बादशाह आहेत, असाही आरोप नलावडे यांनी केला.
नरडवे धरणाच्या कामात अर्थपूर्ण व्यवहार!
पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकाऱयांनी पाहणी करूनही हायवे ठेकेदार कुणाचेच ऐकत नाही. सत्ताधारी सत्तेत असूनही जनतेचे प्रश्न सोडविण्यात अयशस्वी ठरले म्हणूनच आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. आमदार राणेंवरील गुन्हा फास्ट ट्रक कोर्टात चालविण्याची मागणी करणारे सावंत व पारकर यांनी हायवेच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून त्याबाबत फास्ट ट्रक कारवाईची मागणी का केली नाही? हायवेच्या ठेकेदारांकडून काहींनी गाडय़ा घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे ते कारण यामागे आहे का? नोकरीला लावण्यासाठी, बदल्यांसाठी, नरडवे धरणाच्या कामातील ठेकेदाराकडून अर्थपूर्ण व्यवहार केले जातात, अशीही टीका नलावडे यांनी केली.