मतुआ समुदायाचा कल भाजपच्या दिशेने- तिकीटवाटपातील नाराजी भोवण्याची शक्यता
उत्तर 24 परगणा आणि दक्षिण 24 परगणा हे पश्चिम बंगालमधील दोन जिल्हे राज्यातील सरकार कुणाचे येणार हे ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या जिल्हय़ांमध्ये सरस ठरणाऱया पक्षाला बंगालच्या सत्तेवर येणे सोपे ठरते, कारण या दोन्ही जिल्हय़ांमध्ये विधानसभेचे 64 मतदारसंघ (33 जागा उत्तर 24 परगणा आणि 31 मतदारसंघ दक्षिण 24 परगणा जिल्हय़ात) येतात. तृणमूलने 2016 च्या निवडणुकीत उत्तर 24 परगण्यातील 33 पैकी 27 जागा जिंकल्या होत्या. पण यंदा भाजपने त्याच्यासमोर अडचणी उभ्या केल्या आहेत.
22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यात उत्तर 24 परगण्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून येथे तृणमूल-भाजप यांच्यात चुरशीची लढत आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ममतांसोबत राहणाऱया मतुआ समुदायाची मते यंदा विभागताना दिसून येत आहेत. या समुदायाचा कल आता भाजपच्या दिशेने अधिक आहे.
उत्तर 24 परगण्यात मतुआ समुदायाची मोठी संख्या आहे. देशभरात यांची लोकसंख्या 5 कोटी असल्याचे बोलले जाते. यातील 3 कोटी जणांचे वास्तव्य बंगालमध्ये आहे. तर 1 कोटी 80 लाख मतदार आहेत. मतुआ समुदाय अनुसूचित जातीत मोडतो. मतुआ समुदायाची मोठी लोकसंख्या बांगलादेशातून आली असून अद्याप त्यांना कायमस्वरुपी नागरिकत्व मिळालेले नाही. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या दौऱयादरम्यान मतुआ महासंघाचे संस्थापक हरिचंद्र ठाकूर यांच्या मंदिरात भेट दिली होती. मतुआ मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने सीएएचा मुद्दा उचलून धरला आहे.
सीएएच्या माध्यमातून सर्व मतुआ लोकांना कायमस्वरुपी नागरिकत्व देण्यात येणार असल्याचे भाजप सांगत आहे. तर सर्वप्रकारची कागदपत्रे असताना नागरिकत्वाची गरज काय असा प्रश्न तृणमूलकडून उपस्थित केला जातोय. मतुआबहुल गायघाट मतदारसंघात भाजपने बनगांवचे खासदार शांतनू ठाकूर यांचे बंधू सुब्रत यांना उमेदवारी दिली आहे. ठाकूर परिवार मतुआ समुदायाशी संबंधित असून त्यांचा प्रभाव देखील मोठा आहे. तर याच परिवाराच्या ममता ठाकूर तृणमूल काँग्रेससोबत असल्याने मतुआ समुदाय देखील दोन्ही पक्षांदरम्यान विभागला गेल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक नेत्यांची बंडखोरी
मतुआंचा बालेकिल्ला असलेल्या ठाकूरनगरमध्ये सुब्रत ठाकूर यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बंडखोरी केली आहे. बंडखोरांमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. मतुआ समुदायामुळेच भाजपने बनगांव आणि बैरकपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता.
हिंदूबहुल मतदारसंघ
उत्तर-24 परगणा जिल्हा हिंदूबहुल आहे. निवडक मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याक बाहुल्य आहे. मागील दोन वर्षांमध्ये येथे अनेक छोटय़ा-मोठय़ा दंगली झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी अनेकदा बॉम्बहल्ले झाले आहेत. यातून ध्रूवीकरणाला बळ मिळाले आहे. ध्रूवीकरण कमीत कमी व्हावे असा तृणमूलचा पूर्ण प्रयत्न होता. पण सर्वच मतदारसंघांमध्ये ध्रूवीकरणाचा प्रभाव असल्याचे आढळून येते. ज्या 17 मतदारसंघांमध्ये मतदान होणर आहेत, त्यातील 12 मतदारसंघ बनगांव आणि बैरकपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात. या दोन्ही ठिकाणी भाजपचे खासदार आहेत. प्रत्येक मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होत आहे. तृणमूलकडून भाजप निम्म्या जागा हिरावून घेणार असल्याचे चित्र आहे. मतुआ समुदायाचा ओढा भाजपच्या दिशेने अधिक असल्याचे ममता बॅनर्जी यांचे निवडणूक व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांनीच मान्य केले आहे.
जूट मिल्समध्ये बिगरबंगाली अधिक
बैरकपूरमध्ये अनेक जूट मिल्स आहेत. या ठिकाणी हजारोंच्या संख्येत कामगार आहेत. बहुतांशी बिगरबंगाली आणि हिंदीभाषिक आहेत. भाजपने जूट मिल्ससंबंधी अनेक घोषणा केल्या आहेत. याचमुळे हा वर्ग भाजपच्या दिशेने वळताना दिसून येत आहे. तृणमूल काँग्रेसला येथे अल्पसंख्याकांसह मध्यमवर्ग पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे. तृणमूलने उत्तर 24 परगण्यातील अनेक उमेदवार यंदा बदलले आहेत. काही ठिकाणी तर स्थानिक नेत्यांबद्दल जनतेत नाराजी आहे. तृणमूलच्या विजयाच्या वाटेत अडथळे निर्माण करण्याचे काम मुकुल रॉय यांनीच केले आहे. मुकुल रॉय यांना या जिल्हय़ातील राजकारणाची नस ज्ञात असल्याने त्यांच्या सूचनेनुसार भाजपने येथील संघटन मजबूत केले आहे. उत्तर 24 परगणा जिल्हय़ातील बागडा, बनगांव उत्तर, बनगांव दक्षिण, गायघाट, स्वरुपनगर, बदुरिया, हाबरा, अशोकनगर, अमडांगा, बिजपूर, नैहटी, भाटपाडा, जगतदल, नौपारा, बैरकपूर, खरदाहा आणि दमदम उत्तरमध्ये 22 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.