माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा : गळतगा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा
वार्ताहर /खडकलाट
नीती आयोग व कृषी मूल्य आयोगाने साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱयांची एफआरपी रक्कम अडीच महिन्यांमध्ये द्यावी, अशी शिफारस केलेली आहे. मात्र आयोगाच्या शिफारशीचा खरपूस समाचार घेत एफआरपी एकाच हफ्त्यात एकरकमी घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सोमवारी गळतगा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एफआरपी एकरकमी मिळावी याबाबत जाहीर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ऊस उत्पादक शेतकऱयांना मार्गदर्शन करताना राजू शेट्टी बोलत होते. गळतगा येथील झालेल्या जाहीर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रगतशिल शेतकरी वसपाल बोके होते.
याप्रसंगी राजू शेट्टी एफआरपी बाबत शेतकऱयांना माहिती देताना म्हणाले, शेतकऱयांच्या थकीत एफआरपीचा मुद्दा केंद्र? पातळीवर ज्यावेळी गेला, त्यावेळी नीती व कृषी मूल्य आयोगाने ऊस उत्पादकांची एफआरपी कारखानदारांनी ऊसतोड झाल्यानंतर 14 दिवसांत 60 टक्के रक्कम, त्यानंतर 1 महिन्यात 20 टक्के व उर्वरीत 20 टक्के रक्कम एका महिन्यात असे अडीच महिन्यांमध्ये देऊन पूर्ण करावी, अशी शिफारस केलेली आहे. मात्र त्यापुढे जाऊन महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी एफआरपीची 60 टक्के रक्कम 14 दिवसात, त्यांनतर 20 टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यावर व उर्वरीत 20 टक्के रक्कम पुढील गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर देण्यात येईल, असा मनमानी धोरण घेतले आहे. तेंव्हा शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे. याबद्दल शासन दरबारी व लोकप्रतिनीधीही तेच असल्याने आवाज उठवीत नाहीत. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना याबाबत लोकसभेत या शिफारशीचे कायद्यात कधीही रूपांतर होऊ देणार नाही. 12 सप्टेंबर पासून आज अखेर 3 लाख शेतकऱयांनी मिसकॉलद्वारे या शिफारशीला आपला विरोध दर्शविला आहे. साखरेचे उत्पादन कमी करुन इथेनॉल उत्पादन, मोलॅसिस उत्पादन वाढवून रिकव्हरी कमी करुन शेतकऱयांना प्रति टनाला 2900 रुपये देवून लुबाडण्याचा प्रकार सुरु आहे. केंद्र सरकारने साखरेचा भाव 3100 रु. प्रतिटन ठरवून दिलेला असताना तसेच आज साखर 3800 रु. प्रतिटन टेंडरने जात असताना ऊस उत्पादकांना कमी भाव व तुकडय़ा तुकडय़ात मनाला येईल तेंव्हा रक्कम का दिली जाते? शेतकऱयांनी आता आपल्या उसाचा हिशोब, व प्रस्ताव विचारुन तोंड सुरु करावी. यावेळी उसाचे अत्यल्प उत्पादन आहे. तेंव्हा उसासाठी स्पर्धा सुरु होणार आहे. शेतकऱयांनी गप्प न बसता हिशोब विचारुन तोडीस प्रारंभ करावा. शेतकऱयांच्या हितासाठी कुणाबरोबरही विरोध करण्याची हिंमत आहे, म्हणूनच शेतकरी आमच्या पाठीशी आहेत. अनेक चळवळी यशस्वी केल्या आहेत. यंदाची जागतिक ऊस परिषद दसरा झाल्यानंतर मोठय़ाने होईल. मात्र चळवळीची ठिणगी कर्नाटकातूनच पडणार आहे. तेंव्हा शेतकऱयांच्या हितासाठी एकरकमी एफआरपीसाठी चळवळीतून कारखानदारांना छातीवर बसवून लोळवणार, असा इशारा देऊन शेतकऱयांनी चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कर्नाटक राज्याचे प्रभारी आदिनाथ हेमगिरे म्हणाले, गेल्या 20 वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चळवळ सुरु आहे. आज शेतकरी समृध्द झाला आहे. याचे सर्व श्रेय राजू शेट्टी यांनाच जात असल्याचे सांगून सीमाभागातील शेतकऱयांनी या चळवळीला प्रतिसाद द्यावा, अशी विनंती केली. यावेळी निपाणी तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी रयत संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना एकच असून राजू शेट्टींनी कर्नाटक राज्य पातळीवर रयत संघटनेचे नेतृत्व करावे, अशी मागणी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा. एन. आय. खोत यांनी एकीने चळवळीला धार द्या, असे आवाहन केले. रमेश पाटील यांनीही विचार मांडले.
कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे किरण माणगांवे, राजू उपाध्ये, राजु हुळीकोप्पे, बाबासाहेब तेरदाळे, उदय चौगुले, कुमार मरबिल्ले, विद्यासागर चेंडके, पोपट नादणीकर, अभय पाटील, शिवु पाटील, प्रकाश तेरदाळे, तात्यासो केस्ते, नायकू खोत, पिंटू चौगुले, उमेश भारमल, प्रवीण सुतळे, संजू पाटील यांच्यासह गळतगा, बेडकिहाळ, भोज, शिरदवाड, निपाणी, सिदनाळ परीसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्वागत निपाणी तालुका स्वभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष चौगुले यांनी केले तर रावसाहेब खोत यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.