दुसऱ्या टप्प्यातील चार जागांसाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीमध्ये तिरंगी सामना
कडेगाव : प्रतिनिधी
कडेगाव नगरपंचायतच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी चार जागासाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत. येथे सत्ताधारी काँग्रेस,भाजप व राष्ट्रवादीमध्ये तिरंगी सामना होत असून पदयात्रा, मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीनी निवडणूक प्रचारात चांगलीच रंगत आली असून आरोप प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच तापू लागले आहे.
पहिल्या टप्प्यात 13 जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. यावेळी सत्ताधारी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीमध्ये अटीतटीचा सामना झाला आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यात चार जागासाठी 18 जानेवारी रोजी मतदान होत असून या चार जागांवर आपलेच उमेदवार विजयी व्हावेत यासाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे.
सत्ताधारी काँग्रेसचे नेते व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जि.प. चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, जि.प.गटनेते शरद लाड येथे सत्तांतरासाठी प्रयत्नशील आहेत.
आता केवळ चारच प्रभागात निवडणूक असल्यामुळे इतर 13 प्रभागातील कार्यकर्ते व सर्व स्थानिक नेतेमंडळीनी आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोर लावला आहे. कोपरा सभा, पदयात्रा, मतदाराच्या वैयक्तिक गठीभेटी, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे नेते व जि.प.सदस्य शरद लाड आदी नेतेमंडळीही येथे प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून नगरपंचायत निवडणुकीकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.