प्रतिनिधी / उचगांव
करवीर तालुक्यातील प्रगत गडमुडशिंगी ग्रामपंचायतीची ‘माझी वसुंधरा’ अभियानासाठी निवड झाली आहे. या अभियानाचा प्रारंभ गडमुडशिंगीमधून झाला. राज्यातील 272 ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.
अनियमित पाऊस, वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी व कोरोनासारख्या महामारीच्या उच्चाटनासाठी निसर्गपूरक उपाययोजना व पर्यावरण रक्षण या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. 31 मार्च 2021 अखेर हे अभियान राबविण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यातून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्लास्टिक संकलन केंद्र यापूर्वीच सुरू झाले आहे. ओढ्यामध्ये वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येणार असून ओढा व तलावातील गाळ काढण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय व शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवून विजेबाबत त्या स्वावलंबी यापूर्वीच बनवल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग व कूपनलिका पुनर्भरणवर जोर देण्यात येणार आहे. अमृत वननिर्मिती करून वृक्षलागवड पार्क यापूर्वी तयार करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीने 2010 पासून लोकसहभागातून ग्रामविकास साधला असून राज्य व केंद्र शासनाचे विविध पुरस्कार गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने मिळवले आहेत. यापुढेही लोकसहभाग असाच पुढे चालू राहावा, असे आवाहन ग्रामपंचायतीचे प्रशासक संदेश भोईटे व ग्रामविकास अधिकारी आर. एन. गाढवे यांनी केले.