ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अधिक व्यापक करण्यासाठी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्ययावत करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, अत्यावश्यक असेल तरच मास्क घालून व सुरक्षित अंतराचे पालन करुन व प्रशासनातर्फे वेळोवेळी देण्यात आलेच्या सूचनांचे पालन करुनच बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले.
जुन्नर नगरपरिषद सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यक घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास कोविड केअर सेंटरमध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले.
कोरोनाला रोखण्यासोबतच काळजी घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, जुलै आणि ऑगस्ट अखेरपर्यंत रुग्णांची संभाव्य वाढती संख्या विचारात घेता रुग्णालयातील बेडची संख्या, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्धतेचा आढावा घेतला जात असून आरोग्य यंत्रणाचे बळकटीकरण करताना पायाभूत सुविधा, आवश्यक मनुष्यबळ व निधी कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच कोविड सेंटरमध्ये जैव-वैद्यकीय कचरा, भोजन व्यवस्था व आवश्यक सोई सुविधा तसेच उपचाराबाबत दक्षता घ्या. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार येता कामा नये, अशा स्पष्ट सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.