कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन आवश्यक
प्रथम राजकीय पक्षांनीच स्वत:वर बंधने घालणे गरजेचे
राजकीय नेते मंडळींचे दौरे, बैठका, सत्कार समारंभांना फाटा द्या!
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले. लोकांनी एकत्रित येण्यावर निर्बंध आणण्यात आले. लोकांनीही याबाबत काटेकोर पालन केले. त्यावेळी जिल्हय़ातील कोरोनाही नियंत्रणात होता. मात्र, नंतरच्या काळात जिल्हय़ातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 689 हून अधिक जणांचे नुमने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातच आता स्थानिक पातळीवरील समूह संसर्गाचा धोकाही वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत विविध राजकीय मंडळींचे, संस्थांचे कार्यक्रम, बैठका, सत्कार, राजकीय नेतेमंडळींचे दौरे या साऱयावर निर्बंध असण्याची गरज आहे. बाजारपेठांमध्ये होणारी अनियंत्रित गर्दी, मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे न होणारे पालन याबाबत गांभिर्याने घेण्याची गरज आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यानंतर सिंधुदुर्गमधील जनतेने अत्यंत काटेकोरपणे नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य केले. त्यानंतर मुंबईकर चाकरमानी येऊ लागल्याने त्यांच्यातील क्वारंटाईन असलेल्यांपैकीच कुणीतरी पॉझिटिव्ह आढळत होते. मात्र, आता स्थानिक पातळीवरील पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याची संख्या वाढत असल्याचे दिसते. आतापर्यंत सुमारे 689 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. स्थानिक पातळीवरील समूह संसर्गाचा वाढता धोका सिंधुदुर्गच्यादृष्टीने हितावह नाही. असा धोका वाढल्यास सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणाही तेवढय़ा प्रमाणात सक्षम नाही.
दौरे, बैठका बंदच करा
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात काही कालावधीत मंत्री, नेते यांचे दौरे बंद झाले. बैठकांवर काटेकोर बंधने आणण्यात आली. संस्था, राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत नव्हती. सत्कार-समारंभ बंद करण्यात आले होते. मात्र, अलिकडच्या कालावधीत त्याबाबत गांभिर्याने कार्यवाही होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता दौरे, बैठका, सत्कार वा कार्यक्रम होत आहेत. अत्यावश्यक असेल तरच अशी बैठक वा कार्यक्रमाला परवानगी देऊन बैठक व्हावी. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कार्यवाही होणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत तसे होताना दिसत नाही.
बाजारेपठांतील गर्दीवरही नियंत्रण हवे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने लोकांनी कमी प्रमाणात गर्दी केली असली, तरीही आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. मात्र, या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मास्कचा वापर बंधनकारक करण्याच्यादृष्टीने कारवाई व्हायला हवी. बाजारपेठांतील दुकानांमध्ये खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची गरज आहे. तसे न झाल्यास कोरोनाचा वाढता धोका नियंत्रणात आणणे कठिण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धोका टाळण्यासाठी कडक पावले उचला!
दरम्यान, पालकमंत्री, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेत पुढील काही कालावधीसाठी दौरे, बैठका, सभा, उपोषणे, संस्थांचे कार्यक्रम, सत्कार समारंभ अशांबाबत कडक नियमावली तयार करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत वाढता समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही गावपातळीवरील ग्राम नियंत्रण समित्यांना नियमांचे कडक पालन करण्याच्या अनुषंगानेही सूचना देत कार्यवाही होण्याची गरज आहे.