आज उत्तर देण्याची केंद्राला सूचना : तयारी पूर्ण झाल्याची राज्य सरकारची माहिती : आजही होणार सुनावणी
प्रतिनिधी / पणजी
दहावीच्या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत. खंडपीठाने आपल्या यापुर्वीच्या निवाडय़ावर फेरविचार करून परीक्षेवर स्थगिती द्यावी, अशी याचना करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर काल मंगळवारी दुरूस्ती याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेत आता केंद्र सरकारलाही प्रतिवादी बनवण्यात आले आहे. यावर आज बुधवारी 20 रोजी सकाळी 10 वाजता सुनावणी होणार आहे.
याचिकादार सेड्रिक्स वाझ आणि डॉ. अद्वैत देसाई यांच्यावतीने ऍड. ए. एफ. दिनिझ आणि ऍड. रायन मिनेझिस यांनी बाजू मांडली. गोवा सरकारच्यावतीने ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी तर केंद्र सरकारच्यावतीने सॉलिसिटर जनरल प्रविण फळदेसाई यांनी बाजू मांडली.
फक्त दहावीच्या परीक्षेसंबंधीची चर्चा मंगळवारी खंडपीठासमोर झाली. या चर्चेत बारावीच्या परीक्षेचा उल्लेख नव्हता. बारावीची परीक्षा आज 20 मे रोजीपासून सुरू होत आहे तर दहावीची परीक्षा उद्या गुरुवार 21 मेपासून सुरू होणार आहे.
तेव्हा गोव्यात एकही रुग्ण नव्हता
दहावीच्या परीक्षेला स्थगिती देण्यास खंडपीठाने 15 मे रोजी नकार दिला होता, तेव्हा वेगळी परिस्थिती होती. आता त्यात बदल झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. खरा आकडा 42 असून तो अजून उघड झालेला नाही, अशी बाजू याचिकादारांच्या वकिलांनी मांडली. दि. 15 मे रोजी गोव्यात एकही रुग्ण नव्हता. गोवा ग्रीन झोनमध्ये होता.
त्यावेळच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन 17 मे रोजी संपणार होते, परीक्षा दि. 21 मे रोजी सुरु होणार होती. लॉकडाऊनच्या काळात परीक्षा घेतली जात नाही म्हणून स्थगिती नाकार नाकारावी, अशी सरकारची बाजू होती. आता लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. या काळात परीक्षा घेतली जात असल्याने स्थगिती द्यावी, अशी याचना मांडण्यात आली आहे.
आता लॉकडाऊन वाढल्याने स्थगिती द्यावी
फक्त विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नाही तर त्यांचे पालक, परीक्षक, वाहतूक व्यवस्था सांभळणे, परीक्षा केंद्रावरील कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. दि. 17 मे रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असल्यास शैक्षणिक कार्यक्रम व वर्ग घेतले जाऊ नयेत, असे म्हटले आहे. त्यात परीक्षेचाही समावेश असल्याची बाजू याचिकादाराच्या वकिलांनी मांडली आहे.
दि. 17 मे च्या अधिसूचनेप्रमाणे परीक्षा घेतल्या जाऊ शकत नाही, असा मुद्दा याचिकादारांच्यावतीने परत ठासून मांडण्यात आला.
24 तासांत उत्तर देण्याची केंद्राला सूचना
खंडपीठाने केंद्र सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल प्रविण फळदेसाई यांच्याकडे विचारणा केली आणि 24 तासांच्या आत म्हणजे दि. 20 मे रोजी सकाळी 10 वाजण्यापूर्वी केंद्रीय मंत्रालयाकडून उत्तर हवे असल्याचे स्पष्ट केले. केद्र सरकारकडून स्पष्टीकरण मिळणे शक्य झाले नाही, असे उत्तर खंडपीठाला नको आहे. त्यामुळे केंद्र सरकार, गोवा सरकार आणि गोवा शालांन्त शिक्षण मंडळाने आपआपली उत्तरे बुधवारी सकाळी सुनावणी सुरू होण्यापूर्वी एकमेकांना ईमेलद्वारे पाठवण्यात यावी, असेही स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षेबाबत सर्व तयारी पूर्ण
गोवा सरकारच्यावतीने बाजू मांडताना ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी स्पष्ट केले की आरोग्य आणि मुलांच्या सुरक्षेसंबंधी कोणतीच तडजोड केली जाणार नाही. परीक्षा घेण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून परीक्षा अवघ्या दोन दिवसांवर ठेपली आहे. दि. 17 रोजीच्या आदेशात अटी अजूनही शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा घेण्यास कोणतीच हरकत नसल्याचे त्यांनी खंडपीठाला सांगितले.
दहावीची परीक्षा होणे महत्वाचे, विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नका!
भाजपचे परीक्षा विरोधकांना आवाहन
प्रतिनिधी / पणजी
दहावीची परीक्षा घेण्यास भाजपने पूर्ण पाठिंबा दर्शविला असून विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नका आणि त्यांना वेठीस धरू नका, परीक्षेचे राजकारण करू नका, असे आवाहन भाजपने केले आहे.
मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे व माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हे आवाहन केले आहे. गोवा बोर्डाने परीक्षेची सर्व तयारी केली असून आता आयत्या वेळी परीक्षेला आडकाठी आणणे चुकीचे आहे. परीक्षा होणे आवश्यक आहे. त्यासाठी बोर्डाने सर्व प्रकारची व्यवस्था केली असून काळजी घेतली आहे. ज्यांचा शिक्षणाकडे कोणताच संबंध नाही, असे लोक विनाकारण कोर्टात जाऊन विरोध करून परीक्षेचा विषय वादग्रस्त करीत आहेत. हे सर्व दुर्देवी असून दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खुपच महत्वाची आहे, असे पार्सेकर यांनी नमूद केले.
गोव्यात कोरोनाचे संक्रमण नाही व गोमंतकीयांना कोरोनाची लागण झालेली नाही. जे रुग्ण सापडलेत ते गोव्याबाहेरून आलेले आहेत. त्याचा बाऊ करून परीक्षेला विरोध करणे योग्य नाही. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे देखील परीक्षेला विरोध करतात ते चुकीचे असल्याचे मत पार्सेकर यांनी व्यक्त केले.