युएनएचआरसीमध्ये भारताचे प्रत्युत्तर : मानवाधिकारावर बोलण्यापूर्वी स्वतःच्या देशात डोकावून पहा
वृत्तसंस्था / जिनिव्हा
संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत पाकिस्तान आणि तुर्कस्तानने फैलावलेल्या असत्याप्रकरणी भारताने या दोन्ही देशांना चांगलेच फैलावर घेतले आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून निराधार तसेच दुष्टभावनेने प्रेरित दुष्प्रचार करण्याप्रकरणी भारतीय प्रतिनिधीने या दोन्ही देशांची निंदा केली तसेच मानवाधिकारांवर बोलण्यापूर्वी स्वतःच्या देशात डोकावून पाहण्याचा सल्लाही दिला आहे. पाकिस्तानी मानवाधिकार मंत्री शिरीन मजरी यांनी या बैटकीत काश्मीरचा उल्लेख करत भारताने खोटे आरोप केले होते. याचबरोबर तुर्कस्तानच्या विदेश मंत्र्यांनी पाकिस्तानची पाठराखण केली होती.
मानवाधिकार परिषदेच्या 46 व्या अधिवेशनात पाकिस्तानच्या प्रतिनिधीच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देण्याच्या स्वतःच्या अधिकाराचा वापर भारताने केला आहे. पाकिस्तानकडून जागतिक व्यासपीठांचा भारताच्या विरोधात निराधार तसेच दुष्टहेतूयुक्त दुष्प्रचारासाठी सातत्याने वापर करण्यात येत असल्याचे जिनिव्हातील भारताच्या स्थायी मोहिमेचे द्वितीय सचिव सीमा पुजानी यांनी सुनावले आहे.
जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग
जम्मू-काश्मीर तसेच लडाख हे भारताचा अविभाज्य भाग आहेत. या केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुशासन आणि विकास निश्चित करण्यासाठी सरकारकडून उचलण्यात आलेले पाऊल आमचे अंतर्गत प्रकरण आहे. जगात सर्वात खराब मानवाधिकार पार्श्वभूमी असलेल्या देशांनी भारताच्या दिशेने बोट दाखविण्यापूर्वी स्वतःच्या देशात डोकावून पहावे असे पुजानी यांनी म्हटले आहे.
तुर्कस्तानच्या दुखत्या नसेवर बोट
भारताने स्पष्ट शब्दांत तुर्कस्तानला अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप न करण्यासाठी बजावले आहे. भारतीय प्रवक्त्याने तुर्कस्तानला सायप्रसची आठवण करून देत तेथेही संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका प्रस्तावाचे अद्याप पालन करण्यात आले नसल्याचे सांगितले आहे. तुर्कस्तानने सायप्रसच्या एका मोठय़ा भूभागावर कब्जा केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या हस्तक्षेपानंतरही तुर्कस्तानने हा कब्जा सोडलेला नाही.
पाकिस्तानातील अल्पसंख्याक वाऱयावर
पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन आणि शिखांसह अल्पसंख्याकांच्या विरोधात हिंसा, संस्थात्मक भेदभाव तसेच त्यांच्या शोषणाला पुजानी यांनी स्वतःच्या भाषणात अधोरेखित केले आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांवर सातत्याने हल्ले होत असतात. तेथील हिंदू, शिख, ख्रिश्चन समुदायाच्या महिलांची स्थिती दयनीय असल्याचे पुजानी यांनी जगाला निदर्शनास आणून दिले आहे.
बलुचिस्तानात दडपशाही
बलुचिस्तान तसेच अन्य क्षेत्रांमध्ये पाकिस्ताकडून सुरू असलेली राजकीय दडपशाही, लोकांना गायब करणे, त्यांना मनमानी पद्धतीने ताब्यात घेऊन अनन्वित छळ करण्याचा मुद्दाही भारताने उपस्थित केला आहे. तसेच जगभरातील दहशतवाद्यांना पाकिस्तानकडूनच मदत केली जात असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.