प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. मात्र कोविड 19 च्या काळातही बदल्या झाल्याच पाहिजेत, अशी सकारात्मक भूमिका झुम ऍपद्वारे झालेल्या बैठकीत शिक्षक संघटनांनी घेतली. यानंतर प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यातील चर्चेनतर बदल्यांबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.
शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया रत्नागिरीतही राबवली जात आहे. परंतु शिक्षकांची संख्या पाहता 15 टक्केप्रमाणे सुमारे 900 जणांच्या बदल्या अपेक्षित आहेत. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एकत्रपणे शिक्षकांना बोलावणे अशक्य आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी ठाम भूमिका घेत 30 जुलैला होणारी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
जि. प. अध्यक्ष बने आणि शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी शुक्रवारी बदल्यांविषयी शिक्षक संघटनांबरोबर संवाद साधला. यामध्ये प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, उर्दू संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, अपंग संघटनांसह अन्य सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सर्वच पदाधिकाऱयांनी बदली प्रक्रिया राबवली जावी अशी भूमिका मांडली. शिक्षकांच्या बदल्या दरवर्षी झाल्या तर नव्याने अडचणी निर्माण होणार नाहीत. त्यासाठी यंदा कोरोना असूनही ही प्रक्रिया राबवली जावी, अशी भूमिका शिक्षक संघटनांतर्फे मांडली. ही प्रक्रिया गर्दी टाळून कशी करायची, या बाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
ऑफलाईन प्रक्रिया राबवताना समूपदेशनाबरोबर पूर्वीप्रमाणे शिक्षक बदल्यांचे मेमो करणे शक्य आहे. शिक्षकांकडून ऑफलाईन अर्ज मागवणे, त्यातून सेवाज्येष्ठता यादी ठरवून बदल्या करता येऊ शकतात. यामध्ये अचुकता आणण्यासाठी प्रशासनाची भूमिका महत्वाची आहे. त्यात एखादी त्रुटी राहू शकते, मात्र 99 टक्के शिक्षकांना न्याय देता येईल, असे मत यावेळी मांडण्यात आले.
शिक्षक संघटनांची मते जाणून घेतल्यानंतर अध्यक्ष रोहन बने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याशी चर्चा करुन यावर निर्णय घेण्याचे आश्वासन संघटनांना दिले. यावर सोमवार 2 ऑगस्टपर्यंत निर्णय होणे अपेक्षित आहे.
सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर बदल्या करताना अनेक अडचणी आहेत, परंतु या बदल्या झाल्या नाहीत तर गतवर्षी ऑनलाईन पध्दतीने झालेल्या बदलीत रॅण्डम राऊंड, विस्थापित शिक्षक आणि महिलांसाठी अतिदुर्गम असलेल्या शाळांमधील नियुक्त्या झालेल्यांची गैरसोय होऊ शकते. शासनाच्या आदेशानुसार या शिक्षकांनी बदलीची विनंती केली असेल तर त्यांना बदली प्रक्रियेत शाळा निवडण्याची संधी द्यावयाची आहे. कोरोनामुळे ऑनलाईन प्रक्रिया राबवणे शक्य नसल्याने ती ऑफलाईन पध्दतीने घ्यावी लागेल व त्यासाठी समूपदेशन प्रक्रियाही पार पाडावी लागेल.