देवरूख-पर्शरामवाडीतील घटना
प्रतिनिधी/ देवरुख
देवरूख पर्शरामवाडी येथे गुरूवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत सीताबाई राघो पर्शराम यांचे घर खाक झाले. 2 तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र आग आटोक्यात आणताना 2 ग्रामस्थ जखमी झाले. आगीत घरातील कपडे, भांडी, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून 7 लाख 70 हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद तहसील दप्तरी करण्यात आली आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. यावेळी घरातील मंडळी भातझोडणीसाठी शेतात गेले होते.
देवरूख पर्शरामवाडी येथील पर्शराम कुटुंबिय गुरूवारी रात्री शेतात भातजोडणी करत असताना रात्री 8.30च्या सुमारास आकाश पर्शरामला घरामध्ये आग लागल्याचे दिसून आले. कौलारू घर असल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आरडाओरड झाल्याने तत्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
राजू काकडे हेल्प ऍकॅडमीच्या कार्यकर्ते व नगर पंचायत कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या सार्वत्रिक प्रयत्नांना रात्री 10.30च्या सुमारास यश आले. मात्र या भीषण आगीत पर्शराम यांचे कपडे, भांडी, धान्य, शालेय वहय़ा-पुस्तके, अन्य दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व संसारोपयोगी सर्वच वस्तू खाक झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, नगराध्यक्षा मृणाल शेटय़े तसेच पोलीस प्रशासन व महावितरण कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तलाठी बजरंग चव्हाण यांनी पंचनामा केला. यामध्ये पर्शराम यांचे 7 लाख 70 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी पर्शराम कुटुंबियांसमवेत नगरसेविका वैभवी पर्शराम, आनंद पर्शराम व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न
आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावली. काही तरूणांनी धाडसाने घरावर चढत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. एक तरूण घरावरून कोसळण्याचा तर एक तरुण आगीच्या लोळामुळे भाजण्याचा प्रकार घडला. जखमींमध्ये दत्ताराम पर्शराम व रवींद्र पर्शराम यांचा समावेश आहे. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले.
मदतीचे आवाहन
पर्शराम यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून जोडीला मोलमजुरी करून ते कुटुंबाचा गाडा हाकतात. आगीमध्ये घरच भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्यासमोर निवासाचा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. कपडे, अन्नधान्य, भांडी खाक झाल्याने दैनंदिन कामकाजासह रोजीरोटीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तत्काळ नव्याने घर उभारण्याएवढी त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. यामुळे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.