आगार व्यवस्थापनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ मंडणगड
गेल्या पावणेदोन महिन्यापासून मंडणगड आगारातून मुंबईत सेवेसाठी जाणारे चालक-वाहकच कोरोनाग्रस्त झाले आहेत. या कोरोनाग्रस्त कर्मचाऱयांच्या माध्यमातून तालुक्यात कोरोना संसर्गाची भीती असल्याने तालुकावासीय भयग्रस्त झालेले आहेत. आगार व्यवस्थापनाने मात्र कोरोना संसर्गाची सर्व नियमावली पायदळी तुडवत कर्मचाऱयांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टिका केली जात आहे.
यासंदर्भात येथील कर्मचाऱयांनी आमदार योगेश कदम यांच्यासह वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. आगार व्यवस्थापनाने कोरोना नियमावलीचे पालन न केल्याने मुंबईत दहा दिवस काम करून आलेले कर्मचारी पुन्हा सेवा बजावण्यासाठी तालुक्यात फिरत असल्याने तसेच त्यांची कोणतीही चाचणी होत नसल्याने संसर्गाची भीती वाढल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. गेल्या पावणेदोन महिन्यापासून मंडणगड आगारातून मुंबई येथे दररोज 9 गाडय़ा जातात. या गाडय़ांच्या माध्यमातून 36 चालक व वाहक मुंबईला जातात. मुंबईत गेलेल्या या कर्मचाऱयांना दहा दिवस मुंबईत बेस्टच्या धर्तीवर सेवा बजावावी लागते. यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरु होतो. दहा दिवसांनी परत आल्यावर हे कर्मचारी पुन्हा तालुक्यात आपल्या कर्तव्यावर रुजू होतात. मुंबईत जाणारे सर्व कर्मचारी मुंबईतील क्वॉरंटाईन झोनमध्येही जातात. त्यामुळे परत आल्यावर त्यांना मंडणगडमध्ये क्वॉरंटाईन होणे बंधनकारक असतानाही आगार व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे नाईलाजाने नोकरी करावी लागत आहे.
मंडणगड आगारात 160 चालक-वाहक कार्यरत असल्याने मुंबई रुट व बेस्टची सेवा यामुळे ग्रामीण भागाचे वेळापत्रक कोलमडले असून इतर सर्व वाहतूक कर्मचाऱयांअभावी प्रभावित झालेली आहे. गेल्या आठवडय़ात मंडणगड आगारातील कर्मचाऱयांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात 10जण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले कोरोना चाचण्या झालेल्या कर्मचाऱयांचा अहवाल येण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने घरी क्वॉरंटाईन व्हावे असे आरोग्य विभागाने सूचीत केलेले असतानाही चाचणी झालेले सर्व कर्मचारी तीनही दिवस कर्तव्यावर होते व गावागावात फिरून आले आहेत. आगामी काळात तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास यास मंडणगड आगाराचा ढिसाळ व मनमानी कारभार कारणीभूत ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
आगाराने एकीकडे कर्मचाऱयांच्या जीवाशी खेळ चालवला असताना त्यांना डय़ुटीच्या नावाखाली तालुक्यात फिरवून पूर्ण तालुक्याचेच आरोग्य धोक्यात आणण्याचे काम केले आहे. मंडणगड आगाराची कर्मचारी संख्या लक्षात घेता मुंबईत जाणाऱया गाडय़ांच्या आवश्यकतेपेक्षा कितीतरी अधिक गाडय़ा मंडणगड आगाराच्या माध्यमातून दररोज मुंबईला जात आहेत. यात आगार व्यवस्थापनाची नियोजनशून्यता दिसून येत असून कोरोना नियमावली महामंडळच मोडणार असेल तर सर्वसामान्यांकडून कोणत्या अपेक्षा ठेवणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.