विजय हजारे करंडक वनडे स्पर्धा : कर्नाटकवर 72 धावांनी मात, उत्तर प्रदेशशी होणार जेतेपदाची लढत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बहरात असलेला कर्णधार व सामनावीरचा मानकरी ठरलेल्या पृथ्वी शॉने फटकावलेल्या 122 चेंडूतील 165 धावांच्या जोरावर मुंबईने कर्नाटकचा 72 धावांनी पराभव करून विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. दुसऱया उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशने गुजरातचा 5 गडय़ांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. मुंबई व उत्तर प्रदेश यांच्यात येत्या रविवारी फिरोजशहा कोटला मैदानावर जेतेपदासाठी लढत होईल.
पृथ्वी शॉच्या धडाकेबाज शतकामुळे मुंबईने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर 49.2 षटकांत सर्व बाद 322 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी अप्रतिम मारा करीत कर्नाटकला 42.4 षटकांत 250 धावांत गुंडाळून विजयासह अंतिम फेरी निश्चित केली. शॉने या सामन्यातही कर्नाटकच्या अनुभवी गोलंदाजांचा समाचार घेत चौफेर टोलेबाजी केली. त्याने 122 चेंडूत 17 चौकार, 7 षटकारांच्या मदतीने 165 धावा झोडपल्या. त्याचे हे या स्पर्धेतील चौथे शतक आहे. याआधी त्याने दिल्लीविरुद्ध नाबाद 105, पुडुचेरीविरुद्ध नाबाद 227, सौराष्ट्रविरुद्ध नाबाद 185 धावा फटकावल्या होत्या. त्याने एकूण 754 धावा फटकावत या राष्ट्रीय वनडे स्पर्धेत एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा नोंदवण्याचा नवा विक्रम केला. याआधी मयांक अगरवालने 723 धावांचा विक्रम केला होता. नंतर कर्नाटकच्या देवदत्त पडिक्कलनेही 64 धावा जमवित मयांकला मागे टाकत शॉनंतर दुसरे स्थान मिळविले.
पडिक्कलच्या एकूण 737 धावा झाल्या आहेत. शॉ अंतिम फेरीत खेळणार असल्याने हा विक्रम आणखी मोठा होण्याची अपेक्षा आहे.
शॉचा जोडीदार यशस्वी जैस्वाल (6) स्वस्तात बाद झाला. पण शॉने आक्रमणास सुरुवात करीत कर्नाटकच्या प्रत्येक गोलंदाजांवर तुटून पडला. आदित्य तरेने (16) यावेळी दुय्यम भूमिका घेतली होती. या दोघांनी दुसऱया गडय़ासाठी 71 धावांची भागीदारी केली. तरेला बाद करून श्रेयस गोपालने ही जोडी फोडली. शॉने नंतर 48 चेंडूत अर्धशतक आणि 79 चेंडूत सलग दुसरे शतक पूर्ण केले. अष्टपैलू शम्स मुलाणीने त्याला चांगली साथ देताना 45 धावा केल्या. या दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 159 धावा जोडल्या, त्यात शॉचा वाटा अधिक होता. नंतर त्याने 111 चेंडूत दीडशतकही गाठले. 34.1 षटकांत मुंबईने 200 धावांचा टप्पा पार केला.
स्थिरावलेले दोन फलंदाज झटपट बाद झाल्याने नंतर त्यांची स्थिती 4 बाद 234 अशी झाली. अमन खान (25), शिवम दुबे (27) यांनी सुरुवात चांगली करूनही त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता आले नाही. वेगवान गोलंदाज व्ही. वैशाखने मुंबईची मधली व तळाची फळी झटपट गुंडाळली आणि शेवटच्या षटकांत मुंबईचा डाव आटोपला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई 49.2 षटकांत सर्व बाद 322 (पृथ्वी शॉ 122 चेंडूत 165, मुलाणी 45, वैशाख 4-56, प्रसिद्ध कृष्णा 3-64), कर्नाटक 42.4 षटकांत सर्व बाद 250 (पडिक्कल 64, बीआर समर्थ 61, कोटियन 2-23, तुषार देशपांडे 2-37).