ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात मिशन बिगेन सुरू झाले असले तरी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्यात येणार नाही. मात्र, लॉकडाऊनच्या नियमात आणखी शिथिलता आणली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात 1 लाख 59 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही.
कोरोनामुळे सध्या राज्याची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहेत. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मिशन बिगेन सुरू करण्यात आले आहे. कोरोनावर मात करत जगायचं कसं हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही, त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाविरुद्ध आपली दीर्घकाळ लढाई सुरू आहे. हे युद्ध अजून संपलेले नाही. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्याची गरज निर्माण होऊ नये, असेही ठाकरे म्हणाले.