तत्कालीन कारागृह अधीक्षक-जेलरला दणका
खप्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये चोरी प्रकरणातील संशयित आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. कारागृहाचे अधीक्षक आणि जेलर यांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी मानव हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तत्कालीन कारागृह अधीक्षक टी. पी. शेष आणि जेलर के. आर. मोरबद यांना दोषी ठरविले असून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याबाबतची सूचना कर्नाटक गृहविभागाच्या अतिरिक्त सचिवांना करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहामध्ये चोरीच्या आरोपाखाली शेखर अर्जुन मंडोळकर (रा. गंगानगर हॉस्टेल, ज्योतीनगर, गणेशपूर) हा संशयित आरोपी होता. त्याचा मृत्यू कारागृहाचे अधीक्षक आणि मुख्य जेलर यांच्या मारहाणीमुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी एक सहआरोपी आकाश निपाणीकर याने जेएनएफसी तिसरे न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर शेखर याचा मारहाणीतच मृत्यू झाला असून दहा ते पंधरा दिवसांपूर्वी त्याला कारागृह अधीक्षक आणि जेलर यांनी मारहाण केल्याचे आपल्या जबानीत सांगितले होते.
शेखर याला दहा दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर दि. 9 सप्टेंबर 2016 त्याचा मृत्यू झाला होता. कारागृहातच त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.50 वाजता त्याचा मृत्यू झाला होता. मात्र मृत्यू संशयास्पद झाल्याने त्याचा मृतदेह तब्बल 9 दिवस सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या मेंदूमध्ये जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. मात्र हे प्रकरण मानव हक्क आयोगाकडे देण्यात आल्यामुळे आयोगाच्या डीवायएसपींनी याची फेरतपासणी केली. त्यामध्ये शेखर याच्या अंगावर जखमा असल्याचे निदर्शनास आले.
मयत संशयित आरोपी शेखर मंडोळकर याची बहीण संगीता हिने मानव हक्क आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय मानव हक्क आयोगाकडे पाठविण्यात आले होते. राष्ट्रीय मानव हक्क आयोगाने हे प्रकरण राज्य मानव हक्क आयोगाकडे वर्ग केले होते. त्या ठिकाणी तत्कालीन अधीक्षक टी. पी. शेष आणि जेलर के. आर. मोरबद यांना आपली बाजू मांडता आली नाही. मृत्यू झालेल्या संशयित आरोपीच्या अंगावरील जखमांबाबत त्यांना मानव हक्क आयोगासमोर काहीच सांगता आले नाही. तसेच सहआरोपीने न्यायालयात दिलेल्या जबानीमुळे आणि मानव हक्क आयोगाच्या अहवालामुळे कारागृह अधीक्षक आणि जेलर अडचणीत आले आहेत.
त्या ठिकाणी न्यायाधीश चेअरमन डी. एच. वाघेला, सदस्य के. बी. चांगाप्पा, सदस्य आर. के. दत्ता यांनी याप्रकरणाची संपूर्ण चौकशी केली. मयताच्या बहिणीचे म्हणणे ऐकून घेतले. याचबरोबर मयत शेखर याचे वकील ऍड. सुधीर गावडे आणि ऍड. मलिकजान बाळप्रवेश यांनी आपली बाजू मांडली. त्यामध्ये कारागृह अधीक्षक टी. पी. शेष हे दोषी आढळले. याचबरोबर कारागृहाचे जेलर के. आर. मोरबद यांना दोषी धरले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर एफआयआर दाखल करावा, याचबरोबर मयत झालेल्या आरोपीच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये देण्याचे अंतरिम आदेश बजावले आहेत.
हिंडलगा कारागृहातील प्रकरणाला वेगळे वळण
महत्त्वाचे म्हणजे चेअरमननी राज्याच्या गृहविभागाला याप्रकरणाची चौकशी करून ती रक्कम दोघांच्या वेतनामधून कपात करून द्यावी, असेही म्हटले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून हिंडलगा कारागृहातील प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. यापूर्वीही ऍड. सुधीर गावडे आणि ऍड. मलिकजान बाळप्रवेश यांनी येथील न्यायालयामध्ये खंबीरपणे आपली बाजू मांडली होती. मानव हक्क आयोगाच्या डीवायएसपींनी पाहणी केल्याने आणि सहआरोपीने दिलेली जबानी याबाबत गांभीर्याने घेऊन मानव हक्क आयोगाने हा निकाल दिला आहे.
मयत आरोपीच्या बहिणीने मानव हक्क आयोगाकडे हे प्रकरण दाखल केल्याने त्या ठिकाणी या दोन्ही वकिलांनी आपली बाजू खंबीरपणे मांडली आणि या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या निकालामुळे पुढे काय होणार? याकडे आता साऱयांचे लक्ष लागले आहे.