रत्नागिरी तीन, कोल्हापूरसाठी चार, सांगलीसाठी एक बस
प्रतिनिधी / कणकवली:
लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेली रा. प. महामंडळाची आंतरजिल्हा वाहतूक 20 ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रत्नागिरीसाठी तीन, कोल्हापूरसाठी चार, तर सांगलीसाठी एक बस सोडण्यात येणार आहे. या लांब पल्ल्याच्या बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद पाहून संख्या वाढविण्यात येणार आहे. सध्या शासन नियम पाळून 22 प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असणार असल्याची माहिती एसटीचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ व विभागीय वाहतूक अधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.
लॉकडाऊननंतर रा. प. महामंडळाची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून जिल्हय़ांतर्गत वाहतूक सुरू करण्यात आली. अजूनही जिल्हय़ांतर्गत वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मात्र, महामंडळाला आंतरजिल्हा वाहतुकीसाठी परवानगी मिळालेली नव्हती. आता ही परवानगी देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात तीन बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसमध्ये देवगड-रत्नागिरी ही नाटे मार्गे बस सकाळी 7.30 वा. सुटणार असून रत्नागिरीहून दुपारी 2 वा. परतणार आहे. कणकवली-रत्नागिरी बस सकाळी 8 वा. सुटणार असून रत्नागिरीहून दुपारी 12.30 वा. परतणार आहे. सावंतवाडी- रत्नागिरी बस सकाळी 8 वा. सुटणार असून रत्नागिरीहून 12.30 वाजता परतणार आहे. सावंतवाडी-कोल्हापूर ही आंबोली मार्गे बस सकाळी 10 वा. सुटणार असून कोल्हापूरहून सायंकाळी 4 वा. परतीचा प्रवास करणार आहे. वेंगुर्ले-कोल्हापूर आंबोली मार्गे ही बस सकाळी 6.15 वा. सुटणार असून परतीसाठी दुपारी 1.30 वा., तर वेंगुर्ले-फोंडा मार्गे कोल्हापूर ही बस सकाळी 7 वा. सुटणार असून परतीसाठी दुपारी 1.30 वा परतणार आहे. मालवण तळेरे मार्गे कोल्हापूर ही बस सकाळी 9.15 वा. सुटणार असून परतीसाठी दुपारी 3.30 वा., तर देवगड – सांगली ही बस सकाळी 8 वा. सुटणार असून परतीसाठी सांगलीहून दुपारी 2.30 वा. निघणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.