राष्ट्रीय जनता दलाच्या घोषणापत्रात आश्वासन : बेरोजगारांना 1500 रुपये मासिक भत्ता
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाने शनिवारी स्वतःचे घोषणापत्र मांडले आहे. यात रोजगार, कृषी, उद्योग, उच्चशिक्षण, महिला सशक्तीकरणापासून स्मार्ट गावांवर भर देण्यात आला आहे. पक्षाने स्वयंसहाय्यता गट, पंचायतराज, आरोग्यसेवा, क्रीडाधोरणासह एकूण 17 मुद्दय़ांना प्राथमिकता दिली आहे. कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत 10 लाख तरुण-तरुणींना कायमस्वरुपी शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन राजद नेते मनोज झा यांनी दिले आहे. सत्तेवर आल्यास शेतकऱयांची सर्व कर्जे माफ करण्याची घोषणा राजदने शनिवारी केली आहे.
याचबरोबर घोषणापत्रात समान कामाच्या बदल्यात समान वेतन आणि सर्व विभागांमधील खासगीकरण संपुष्टात आणण्याचा मुद्दा नमूद आहे. तरुण-तरुणींना रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाणार असून नवी पदेही निर्माण केली जातील. कंत्राटी स्वरुप संपुष्टात आणून सर्व कर्मचाऱयांना कायमस्वरुपी नियुक्ती दिली जाईल. रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरता नव्या औद्योगिक धोरणाच्या अंतर्गत प्रभावी कररचना आणि करमाफी योजना आणणार असल्याचे आश्वासन राजदने दिले आहे.
शेतकऱयांची काळजी घेणार
सर्व सिंचन पंपांना सौरपंपात रुपांतरित करण्याचे आश्वासन राजदने घोषणापत्राद्वारे दिले आहे. शेतकऱयांची सर्व कर्जे माफ करण्यात येणार असल्याचे घोषणापत्रात नमूद आहे. क्रीडा धोरणाच्या अंतर्गत बिहारमध्ये भव्य क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसह प्रत्येक विभागात एक मोठे स्टेडियम तयार करण्याचा मुद्दा घोषणापत्रात सामील आहे. राजदने वृद्धत्व निवृत्तीवेतनाप्रकरणी जुनी व्यवस्था लागू करणार असल्याचे म्हटले आहे. गावांना स्मार्ट करण्यावर भर देण्याचा विचार मांडला आहे.
महाआघाडी विरुद्ध रालोआ
बिहारमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणि संजदच्या नेतृत्वाखालील रालोआ यांच्यात मुख्य लढत आहे. तर चिराग पासवान यांच्या लोजपनेही दोघांसमोर आव्हान उभे केले आहे.