ममता बॅनर्जी येणार, काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना निमंत्रण नाही
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या राष्ट्रप्रमुखांसाठी, तसेच इतर अनेक मान्यवरांसाठी आज शनिवारी शाही भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या भोजनासाठीच्या आमंत्रितांची सूची घोषित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री, सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान इत्यादींना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक तसेच या परिषदेला उपस्थित राहणारे सर्व राष्ट्रप्रमुख किंवा त्यांचे प्रतिनिधी भोजन कार्यक्रमालाही येणार आहेत. हा कार्यक्रमाचा प्रारंभ शनिवारी सायंकाळी सव्वासवा वाजल्यापासून करण्यात येणार आहे. राष्ट्रप्रमुखांना आणि इतर आमंत्रितांना आणण्यासाठी विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
अनेक राज्यांचे मुख्यमंत्री येणार
याशिवाय भारत सरकारच्या सर्व सचिवांनाही या कार्यक्रमांचे आमंत्रण आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित रहाणार असल्याचे कळविले आहे. बिहारचे मुख्यमंत्रंाr नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे येत आहेत.
माजी पंतप्रधानांना निमंत्रण
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि एच. डी. देवेगौडा यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. तथापि, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. ते कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री नसल्याने त्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
डाव्यांची टोमणेबाजी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी जात आहेत. त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून जात आहेत, की ‘पश्चिम वंग’च्या मुख्यमंत्री म्हणून, अशी खोचक पृच्छा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. तर राज्यातील भाजप नेते राहुल सिन्हा यांनी मात्र, बॅनर्जी यांच्या निर्णयाची प्रशंसा केली आहे.