राहुल गांधींच्या नेतृत्त्वात 14 जानेवारीपासून ‘भारत न्याय यात्रा’ मोहीम…
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत न्याय यात्रा सुरू करणार आहेत. ही मोहीम 14 जानेवारीला मणिपूरमध्ये सुरू होऊन 20 मार्चला मुंबईत संपेल. या कालावधीत ही यात्रा 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांना व्यापणार आहे. या काळात राहुल गांधी बसने आणि पायी 6 हजार 200 किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस पक्ष भारत न्याय यात्रा काढत असल्याचे काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांनी बुधवारी पक्षाच्या मुख्यालयात प्रसारमाध्यमांना सांगितले.
भारत न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून महाराष्ट्रात दाखल होईल. राहुल गांधी 14 जानेवारीपासून सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ‘भारत न्याय यात्रा’ या महत्त्वाच्या प्रवासाला निघणार आहेत. 67 दिवसांच्या प्रवासात राहुल गांधी विविध स्तरांतील लोकांना भेटून त्यांची मते ऐकतील. लोकांना एकत्र आणणे आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव करणे हा राहुल गांधींच्या या भेटीमागील मुख्य उद्देश आहे. या दौऱ्यात राहुल गांधी अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार या मुद्यांवरही बोलणार आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी थेट जनतेशी संपर्क साधत त्यांची मते जाणून घेणार आहेत. 2024 च्या निवडणुकीत पक्षाला मजबूत स्थितीत आणण्यासाठी काँग्रेस पक्षासाठीही ही यात्रा महत्त्वाची मानली जात आहे.
पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय हा भारत न्याय यात्रेचा उद्देश आहे. या प्रवासादरम्यान राहुल गांधी यांच्यासह अन्य नेते तऊण, महिला आणि उपेक्षित लोकांना भेटतील. या प्रवासात बराचसा मार्ग बसमधून पार केला जाणार आहे. तथापि, प्रवासातील काही छोटे भाग मधून-मधून पायी चालत पार केले जातील, असे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. याशिवाय 28 डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाची नागपुरात मेगा रॅली होणार आहे. या मेगा रॅलीच्या माध्यमातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी 145 दिवसांची भारत जोडो यात्रा
यापूर्वी राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत भारत जोडो यात्रा काढली होती. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेला 145 दिवसांचा हा प्रवास जम्मू-काश्मीरमध्ये संपला होता. या यात्रेत राहुल गांधी यांनी 3,570 किलोमीटरच्या प्रवासात 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश व्यापले होते. या भेटीदरम्यान राहुल गांधींनी 12 सभांना संबोधित करण्याबरोबरच 100 हून अधिक बैठका आणि 13 पत्रकार परिषदा घेतल्या.
यात्रेत दिग्गजांचाही सहभाग
भारत जोडो यात्रेत प्रसिद्ध व्यक्ती, लेखक, लष्करी दिग्गजांचाही सहभाग होता. यामध्ये माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) दीपक कपूर, माजी नौदल प्रमुख अॅडमिरल (निवृत्त) एल रामदास आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, माजी वित्त सचिव अरविंद मायाराम यांचा सहभाग लाभला. राहुल गांधींच्या या प्रवासात राजकारणापेक्षा त्यांचा लूक चर्चेत राहिला होता. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीमध्ये यात्रेला सुऊवात झाली तेव्हा राहुल यांच्या चेहऱ्यावर हलकी दाढी होती, मात्र सुमारे पाच महिन्यांनंतर त्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलले होते. चेहऱ्यावर दाट दाढी होती आणि डोक्मयावर केसही वाढले होते. याचदरम्यानचा त्यांचा पांढरा टी-शर्टही चर्चेत आला होता.