बेळगावातील शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत कालानुरुप बदल; मात्र जनतेत अभिमान अन् उत्साह कायम
बेळगाव : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य अभिमान बाळगावा तो बेळगावकरांनीच! कारण मुंबई-पुण्यापेक्षाही भव्यदिव्य शिवजयंती व चित्ररथ मिरवणूक बेळगावमध्येच निघते. येथील गल्लोगल्लीत, गावागावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या जयघोषानेच कोणत्याही कामाची सुरुवात होते. याच ऊर्जेतून शंभर वर्षांपासून शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. शतकोत्तर परंपरेचा वारसा लाभलेल्या या सळसळत्या उत्सवामध्ये कालानुरुप अनेक तांत्रिक बदल झाले आहेत. यावर्षी शनिवार दि. 27 मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. ही मिरवणूक केव्हापासून बेळगावमध्ये काढली जाते, याबद्दल अनेक तरुण शिवभक्तांना माहिती नाही. जाणकार व्यक्तींच्या मते शिवजयंती केव्हा सुरू झाली, याची ठोस माहिती नसली तरी 1919 मध्ये पहिली शिवजयंती साजरी झाली असावी, असे सांगितले जाते. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने पहिली शिवजयंती साजरी झाली होती. तत्कालिन मराठा समाजातील काही नागरिकांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली. त्यानंतर मात्र शिवजयंतीचे स्वरुप व्यापक बनत गेले आणि झेंडा चौक येथील व्यापाऱ्यांनी एकत्रितरीत्या शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत बेळगावमध्ये सजीव देखावे सादर केले जातात. आज तंत्रज्ञानामुळे सजीव देखावे सादर होत असले तरी पूर्वीच्या काळी वेगळ्या स्वरुपात देखावे केले जात होते. 1956 मध्ये भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने तत्कालिन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. सरकारच्या विरोधात सीमावासीयांच्या मनात प्रक्षोभ होता. हीच चीड अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवजयंतीच्या देखाव्यांतून मांडण्याचा प्रयत्न केला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सीमावासीयांना समजावा यासाठी काही गल्ल्यांच्या चित्ररथांवर देखावे सादर केले होते. महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा तेव्हा शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील गाड्यांवर व्यक्त होत होती.
सहभागींना पितळेची बादली भेट
शिवजयंतीचे स्वरुप पूर्वीपासूनच तीन दिवसांचे होते. पहिल्या दिवशी अक्षय्यतृतीयेला शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जात होता. तिसऱ्या दिवशी शहरातून भव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जात होती. त्या काळी बसवन कुडची येथील गाडा व बैलजोड्या शिवजयंती मिरवणुकीसाठी आणल्या जात होता. त्यांच्यासोबत बेळगाव व परिसरातील बैलगाड्यांचा समावेश असायचा. बैलांसोबत रेडेही त्या काळी जुंपले जात होते. सहभागी झालेल्या जनावरांच्या मालकांना पितळेची बादली भेट स्वरुपात दिली जात होती, अशी माहिती जुन्या जाणकारांनी दिली. पारंपरिक सनईच्या सुरांमध्ये प्रमुख गल्ल्यांमधून शिवजयंतीची मिरवणूक थाटात काढली जात होती. काळानुरुप शिवजयंती मिरवणुकीत बदल होत गेला. 1978 च्या सुमारास यांत्रिकीकरणामुळे बैलगाड्यांऐवजी ट्रॅक्टर व ट्रकचा वापर मिरवणुकीत केला गेला. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांमुळे बऱ्यापैकी उंची लाभत असल्याने सर्वच शिवप्रेमींना देखावा पाहणे सोयीचे ठरत होते. सजीव देखावे सादर होऊ लागल्याने केवळ बेळगावच नाही तर चंदगड, खानापूर या परिसरातूनही शिवभक्त दाखल होऊ लागले. 2004 नंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत उत्तमोत्तम सजीव देखावे सादर केले जाऊ लागले. सध्याच्या घडीला 70 ते 75 शिवजयंती मंडळे शिवचरित्रावर आधारित सजीव देखावे सादर करतात.
परप्रांतीयांनाही वाटायचा अभिमान
बेळगाव शहर सुरुवातीपासूनच व्यापारी शहर म्हणून ओळखले जात असल्याने उत्तर तसेच दक्षिण भारतातील अनेक व्यावसायिक व्यवसायानिमित्त येथे स्थायिक झाले. त्यानंतर बेळगावच्या संस्कृतीमध्ये ते काही काळातच मिसळून गेले. त्यामुळेच बेळगावच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत मारवाडी, गुजराती, बंगाली व बिहारी नागरिकांचाही समावेश असायचा. छत्रपतींच्या जीवनकार्यातील प्रसंग बेळगावमध्ये हुबेहूब साकारले जात असल्याने एक वेगळेच आकर्षण या परप्रांतीय नागरिकांना होते. अनेक परप्रांतीय नागरिक आजही चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होत असतात.