पक्षाच्या निवडणूक समितीची बेंगळुरात बैठक : तीन-चार दिवसांत हायकमांडकडे संभाव्य उमेदवारांची यादी
प्रतिनिधी /बेंगळूर
विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने उमेदवारांच्या निवडीसाठी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी बेंगळुरात काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक झाली असून 150 मतदारसंघांमधील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आल्याचे समजते. सदर यादी पुढील तीन-चार दिवसांत हायकमांडकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
उमेदवार निवडीसंदर्भात गुरुवारी बेंगळूरबाहेरील रिसॉर्टमध्ये काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक झाली. काँग्रेस राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद यांच्यासह निवडणूक समितीतील सर्व सदस्य बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक मतदारसंघातील नेते, जिल्ह्यातील नेते व जिल्हाध्यक्षांची मते जाणून घेण्यात आली आहेत. दिल्लीतील नेत्यांनी केलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणावरही चर्चा करण्यात आली. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार 130 मतदारसंघांसाठी एकाच व्यक्तीच्या नावाची शिफारस वरिष्ठांकडे केली जाणार आहे. तर तीव्र विरोध आणि आक्षेप असणाऱ्या मतदारसंघांमधील संभाव्य उमेदवारांची नावे दुसऱ्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे समजते.
पहिल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत 150 मतदारसंघांमधील नावे समाविष्ट केली जाणार आहेत. विद्यमान आमदारांसह मागील निवडणुकीत कमी मतांच्या फरकाने पराभूत झालेल्यांची नावे या यादीत समाविष्ट होणार आहेत. काही विद्यमान आमदारांनी वयाच्या कारणावरून राजकीय निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याला तिकीट देण्याची मागणी केली आहे. मात्र, अशा इच्छुकांपैकी किती जणांना तिकीट द्यावे याबाबत रणदीप सुरजेवाला यांनी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले आहे.
लवकरच उमेदवारांची नावे जाहीर करणार : शिवकुमार
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची नावे लवकरात लवकर जाहीर केली जातील, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. भाजप सरकारकडून काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघांना योग्य निधी देण्यात आलेला नाही. तरी सुद्धा आपल्या पक्षातील सर्व आमदारांनी चांगल्या रितीने कामे केली आहेत, असे सांगून त्यांनी विद्यमान आमदारांना तिकीट निश्चित असल्याचे संकेत दिले आहेत.
प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार निवडीविषयी सखोल चर्चा झाली आहे. उमेदवार निवड हे आपल्यासमोरील आव्हान नाही. निवडणूक जिंकणे हेच पुढील उद्दिष्ट आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येणार असल्याने प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे, असेही ते म्हणाले.