केंद्रीय मंत्री गिरिराज सिंहांचे टीकास्त्र
नवी दिल्ली : भाजपचे फायरब्रँड नेते आणि केंद्रीयमंत्री गिरिराज सिंह यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात जाण्यासाठी काँग्रेसकडे नैतिक बळ नाही. काँग्रेसचे नेते हे मौसमी हिंदू आहेत. मतांची गरज असल्यास ते सॉफ्ट किंवा मवाळ हिंदू होण्याचा प्रयत्न करतात अशी टीका गिरिराज यांनी केली आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर काँग्रेसमधील कुणीच नेता अयोध्येत गेलेला नाही. काँग्रेस पक्षानेच अयोध्या प्रकरण न्यायालयात प्रलंबित ठेवण्याचे काम केले होते, याचमुळे काँग्रेसकडे अयोध्येत जाण्याचे नैतिक बळच नाही. काँग्रेस हा स्वत:हून समाप्त होणारा पक्ष आहे. जनता देखील आता काँग्रेसचे सत्य जाणून असल्याचा दावा गिरिराज यांनी केला आहे.
ममता बॅनर्जींचा पक्ष हा….
ममता बॅनर्जी यांचा पक्ष हा एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि अशी कंपनी अन्य कुणालाही शेअरधारक करत नाही. पक्षाचा सुपर शेअरधारक त्यांचा भाचा (अभिषेक बॅनर्जी) आहे. जर कुणी हिस्सा मागू इच्छित असल्यास आणि अभिषेक बॅनर्जी यांना विरोध करू पाहत असल्यास ममता बॅनर्जी यांना ते सहन होणार नाही. ममता बॅनर्जींच्या पक्षाचे सत्य जनतेला कळून चुकले आहे. आगामी निवडणुकीत जनताच ममता बॅनर्जी यांना धडा शिकविणार असल्याचे गिरिराज यांनी म्हटले आहे.