नवरात्रीच्या आठव्या माळेपासून सुरू होतो उत्सव राहणीमान बदलले, तरी परंपरा जपणे कायम दसऱ्याला मांडावर एकत्र येतात विविध कुळे
सांगे : गोव्यातील धनगर-गवळी समाज बऱ्याच प्रमाणात विखुरलेला आहे. पूर्वी हा समाज डोंगरकपारीत राहायचा. पण आता तो गावांमध्ये स्थायिक झालेला आहे. या समाजाचे सर्वांत महत्त्वाचे सण म्हणजे नवरात्र व दसरा असून हा समाज हे उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो. सांगे तालुक्यातील पोत्रे येथे धनगर लोक मोठ्या उमेदीने दसरा उत्सव साजरा करतात. यंदा काल रविवारपासून त्यांच्या उत्सवाला प्रारंभ झाला. पोत्रेतील धनगरांची विभिन्न कुळे दसऱ्याच्या मांडावर मंगळवारी एकत्र येतील आणि ‘म्हालची पांढर’च्या नावाने स्वत:ला एकात्मतेच्या धाग्यात गुंफण्याचे काम करतील. पोत्रे हा सांगेतील भाटी ग्रामपंचायत क्षेत्रातील लहानसा वाडा असून धनगरांची जेमतेम विसेक घरे आहेत. पूर्वी त्यांचा पशुपालन हा व्यवसाय होता. येथील धनगर-गवळी समाजाच्या दसऱ्याची सुऊवात नवरात्रीच्या आठव्या माळेपासून म्हणजे काल रविवारपासून झाल्याचे जानो पदू ताटे यांनी सांगितले.
नारळांची माटोळी बांधण्याची प्रथा
पहिल्या दिवशी घरातील देव्हाऱ्यात कुलदेवतेचे पूजन केले जाते. तीर्थप्रसाद वाटण्यात येतो. या कुलदेवतेच्या पूजनाच्या ठिकाणी माथ्यावर माटोळी बांधण्याची आणि या माटोळीला नारळ तसेच जंगलातील रानफळे-फुले बांधण्याची परंपरा आहे. कुणी पाच नारळाचे तोरण बांधतात, तर कुणी पुन्हा दसऱ्याच्या दिवशी आणखी पाच नारळांचे तोरण बांधतात. त्यादिवशी सायंकाळी सातपासून जागर सुरू होतो. ढोल-ताशे घेऊन जागर केला जातो, महिला फुगड्या घालतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सोमवारी देवाची वस्त्रs नदीवर नेऊन स्वच्छ पाण्यात धुवून आणली जातील. याचा अर्थच असा की, देव स्नानाला गेला आहे. त्यानंतर देवाची पूजा केली जाते. दूध-भाताचा नैवेद्य दाखविला जातो. घरी शस्त्रपूजन होते म्हणजे शिलंगण पूजेला लावले जाते. घरात आरत्या, तीर्थप्रसाद आणि दुडगे हा प्रकार होतो, अशी माहिती गंगाराम कस्तुरे यांनी दिली.
दसऱ्याच्या दिवशी मांडावर विधी
तिसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी वाड्याच्या माळावरील मांडावर घरातून देव आणला जाईल. या मांडावर आपट्याची फांदी लावली जाते. प्रत्येक कुळावी देवासाठी कांबळ जमिनीवर पसरवून तांदळांच्या साहाय्याने आयताकृती रेखाटतो. त्यामध्ये नारळ आणि पानाचा विडा ठेवतात. बारा वाडी म्हणजे बारा नैवेद्य अर्पण केले जातात. त्या सर्वांवर सोने म्हणून आपट्याचे पान अर्पण केले जाते. ‘म्हालची पांढर’च्या नावाने जयजयकार केला जातो. यावेळी ‘म्हालची पांढर’ला सामूहिक गाऱ्हाणे घालून, समस्त कुळांवर सुख-समृद्धीची पखरण करावी, असे आवाहन केले जाते. घरून मांडावर देव आणताना पेटविलेली आरती सोबत असते. परत मांडावरून घरी जाताना सोबत आरती पेटलेली असते. मांडावरच नारळ फोडून त्या पाण्यात दही, ताक, लोणी मिसळून वरती शिंपडले जाते. नंतर ते घरी आणून घराच्या मुख्य पाटीवर शिंपडले जाते. यालाच ‘दुडगे’ असे म्हणतात.
घरोघरी सादर केले जाते गजानृत्य
आपल्या पारंपरिक वेशात धनगर पुऊष, महिला गजानृत्य करून, फुगडी घालून रात्री जागवतात. दसऱ्याच्या काळात समाजबांधव आपल्या वस्तीवरील प्रत्येक घरी फिरून गजानृत्य सादर करतात. ढोल आणि थाळीच्या गजरात सादर केले जाणारे हे विशिष्ट प्रकारचे नृत्य आहे. या नृत्यात पायांनी धरला जाणारा ताल आणि हातवारे हे मुख्य आकर्षण असते. नृत्य करत असताना ‘हरे गजा चांगभलं’ हे वाक्य विशिष्ट लयीत म्हटले जाते. धनगर समाज हा म्हशी व शेळींचे पालन करणारा असल्याने गजानृत्यात या प्राण्यांचे हावभावही दिसतात. या भागात या नृत्याला ‘चपय नृत्य’ म्हणूनही संबोधले जाते. यात पुऊष मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. दसऱ्याला धनगर समाजातील स्त्रिया धनगरीफुगडी घालतात. आजच्या या बदलत्या काळात गोमंतकीय धनगर-गवळी समाजाचे राहणीमान बदलत चालले असले, तरी गजानृत्य सादर करण्याची परंपरा अजूनही सुरू आहे. आजही धनगरांच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक जीवनात ‘म्हालची पांढर’ला महत्त्वाची आणि भक्तीभावाची जागा लाभलेली आहे. त्याची प्रचिती दसऱ्याच्या दिवशी प्रकर्षाने येते. पोत्रे येथे लांबोर, ताटे, यमकर, रेखडो, कस्तुरे आदी कुळे वास्तव्य करून आहेत.
नवस फेडण्याची आगळी पद्धत
याशिवाय जर कुणी नवस केलेला असेल, तर तो मोठ्या उमेदीने फेडला जातो. त्याकरिता शक्य असेल त्याप्रमाणे पाच किंवा दहा धनगरांना वस्तीत पानाचा विडा देऊन आमंत्रण दिले जाते. तसेच वाड्यावरील सर्वांना आमंत्रण देण्यात येते. बाहेरच्या गावचे धनगर लोक आल्यावर त्यांचे ‘पाल धरून’ म्हणजे वर पालखी धरून सन्मानपूर्वक स्वागत केले जाते. या सर्वांच्या उपस्थितीत नवस फेडला जातो, असे जानो पदू ताटे यांनी सांगितले. वाड्यावरील प्रत्येक घरात जी तोरणवजा माटोळी बांधलेली असते ती नवस फेडला जाईपर्यंत तशीच ठेवली जाते. नवस फेडल्यावर प्रसाद वाटण्यात येतो. धनगर लोक त्याला ‘शेरणी’ असे संबोधतात, असे ताटे यांनी सांगितले. हा प्रसाद ज्या गावातून बाहेरचे धनगर लोक आलेले असतात त्या गावातील लोकांसाठीही पाठविण्याची परंपरा आहे.