इंडोनेशियाने पाम तेल निर्यातीवरील बंदी उठविली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी काळात खाद्यतेलाचे दर घसरण्याची शक्यता आहे. इंडोनेशिया या देशाने पाम तेलाच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, भारताला तेलाचा पुरवठा सुरळीत होऊन तेलदर घटतील असे स्पष्ट झाले आहे. 23 मे पासून इंडोनेशिया पाम तेल निर्यात करण्यास प्रारंभ करणार आहे.
गुरुवारी इंडोनेशियातील तेल व्यापाऱयांनी त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडे तेल निर्यातीवरील बंदी उठविण्याची मागणी केली होती. त्यानंतर ही बंदी मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. येत्या सोमवारपासून इंडोनेशिया खाद्यतेलाच्या निर्यातीला पुन्हा प्रारंभ करणार असल्याने त्यानंतरच्या तीन-चार दिवसांमध्ये भारतात तेलदरात सौम्यता येईल, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
निर्यातबंदी केल्याने इंडोनेशियातील खाद्यतेल साठा वाढला आहे. त्यामुळे अधिक तेल साठविण्याची क्षमता संपत आली आहे. हा देश पाम तेलाच्या उत्पादनापैकी केवळ 35 टक्के तेल देशात उपयोगात आणतो. उर्वरित 65 टक्के तेलाची निर्यात केली जाते. भारत दरवर्षी या देशाकडून 50 लाख टन पामतेल आयात करतो. 2020-2021 या आर्थिक वर्षात भारताने 83.1 लाख टन पामतेल आयात केले.