मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन एस. ए. यांचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
दंड महत्त्वाचा नाही तर आपला जीव आणि कुटुंब महत्त्वाचे आहे. तेव्हा दंडाला अधिक महत्त्व देण्यापेक्षा वाहतुकीचे नियम पाळा आणि सुरक्षित जीवन जगा, असे आवाहन मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन एस. ए. यांनी केले आहे.
न्यायालयाच्या सभागृहामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन बेळगावच्या जनतेला वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केले आहे. हेल्मेट परिधान केले नाही तर दंड हा भरावा लागणारच. जर चुकून अपघात झाला तर आपला जीव जाऊ शकतो. तेव्हा दंडापेक्षा ही घटना गंभीर आहे. याचा प्रथम साऱ्यांनी विचार करणे गरजेचे आहे. बरेच वाहनचालक विमाच उतरवत नाहीत. त्यामुळे अपघात घडल्यानंतर नुकसानभरपाई मिळणे कठीण जाते. तेव्हा वाहनाचा विमा भरणे महत्त्वाचे आहे.
बऱ्याचवेळा अपघातात अनेकांचा मृत्यू होतो. मात्र विमा भरला नसल्यामुळे कुटुंबीयांना काहीच नुकसानभरपाई मिळत नाही. याचाही गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. दुचाकी, चारचाकी वाहने चालविण्याचा परवाना अनेकांचा नाही. मात्र अपघात घडल्यानंतर कायदेशीर फटका त्यांना आणि समोरच्या व्यक्तीलाही बसतो. प्रत्येकाने वाहनांची कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना आणि जे वाहतुकीचे नियम आहेत ते पाळणे महत्त्वाचे आहे.
सध्याच्या धावत्या युगामध्ये प्रत्येकाला घाईगडबड असते. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. दंड लावला तर तो भरू, अशी काहींची समजूत आहे. मात्र दंड भरणे हा आपला पर्याय नाही. तेव्हा याचा सारासार विचार करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन एस. ए. यांनी सांगितले.