महागाई भत्त्याची घोषणा अन् किमान आधारभूत दरात वाढ : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच शुभवार्ता दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली आहे. तर रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत दरात वाढ करण्यात आली आहे. या निर्णयांना बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीत अन्य महत्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे प्रमाण आजवर मूळ वेतनाच्या 42 टक्के होते. ते आता 46 टक्के करण्यात आले आहे. वाढलेल्या प्रमाणातील महागाई भत्ता जुलै 2023 पासूनचा दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी जुलैपासून धरून दिली जाईल. या निर्णयाचा लाभ केंद्र सरकारची नोकरी केलेल्या निवृत्ती वेतनधारकांनाही मिळणार आहे. साधारणत: 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांना हा लाभ मिळणार आहे.
किती वाढणार वेतन
केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 50 हजार रुपये प्रतिमहिना असेल तर त्याला या मूळ वेतनाच्या 46 टक्के, अर्थात 23 हजार रुपये महागाई भत्ता दिला जाईल. यापूर्वी तो 21 हजार रुपये होता. याचा अर्थ असा की त्याच्या एकंदर वेतनात 2 हजार रुपयांची वाढ होईल. मूळ वेतनाच्या प्रमाणात महागाई भत्ताही वाढीव मिळणार आहे, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार
रब्बी हंगामातील पिकांसाठी केंद्र सरकारने किमान आधारभूत दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महत्वाच्या पिकांसाठी ही वाढ दिली जाणार आहे. गहू, बटाटा, मसूर, मटार, मोहरी, हरभरा, जवस आणि सातू ही रब्बी हंगामातील प्रमुख पिके मानली जातात. गव्हाचे किमान आधारभूत मूल्य 150 रुपये प्रतिक्विंटलने वाढविण्यात आले आहे. याशिवाय तीळ आणि मोहरी यांच्या किमात आधारभूत मूल्यात प्रत्येकी 200 रुपये प्रतिक्विंटलने वाढ करण्यात आली आहे. तर मसूर 425 रुपये, सातू 115 रुपये, हरभरा 105 रुपये आणि सूर्यफूल 150 रुपये, अशी वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
लडाखमध्ये ऊर्जानिर्मिती
लडाखमध्ये 7.5 गीगावॅटस् सौरविद्युत निर्मिती करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. ते पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली आहेत. या भागात 13 गीगावॅटस् पुननिर्मितीक्षम ऊर्जा निर्माण करण्यासाठी योजना बनविण्यात आली आहे. तसेच या ऊर्जानिर्मितीचा प्रारंभ झाल्यानंतर तिचे वहन करण्यासाठी व्यवस्थाही करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बोनस
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचीही घोषणा करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका दिवाळी बोनस दिला जाणार आहे. या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. अशाप्रकारे केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांची मागणीही पूर्ण केली आहे, अशी माहिती देण्यात आली.
काही पिकांचे नवे एमएसपी दर
पीक एमएसपी वाढ नवा एमएसपी लाभ
गहू 150 2,275 102 टक्के
सातू 115 1,850 60 टक्के
हरभरा 105 5,440 60 टक्के
मसूर 425 6,425 89 टक्के
मोहरी 200 5,650 98 टक्के
सूर्यफूल 150 5,800 52 टक्के