मागील जुलैपासून भारतीय क्रिकेट संघाने 15 क्रिकेट मालिका खेळल्या असून आश्चर्य म्हणजे त्यात 7 वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले गेले आहेत. भारतीय निवडकर्त्यांनी काही छान गाणी डाऊनलोड केली असावीत आणि कर्णधार नेमताना संगीतखुर्चीप्रमाणे खेळाडूंना खुर्चीभोवती फिरायला लावत ती गाणी वाजवावीत आणि मध्येच गाणे थांबवून त्यावेळी समोर कोणता खेळाडू असेल, त्याकडे नेतृत्व भूषवावे, अशी नेतृत्वाचीच संगीतखुर्ची सुरु असल्याची खुमासदार चर्चा माध्यमांमध्ये सुरु झाली आहे. भारताने यादरम्यान कोणा-कोणाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आणि त्यांची कामगिरी कशी राहिली, यावर छोटासा प्रकाशझोत!
विराट कोहलीपासून शिखर धवन, दिनेश कार्तिकपर्यंत!
मागील जुलैपासून या जुलैपर्यंत भारताने आतापर्यंत तिन्ही क्रिकेट प्रकारात 15 मालिका खेळल्या असून यादरम्यान थोडेथोडके नव्हे तर चक्क 7 कर्णधार आजमावून पाहिले. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, रिषभ पंत, केएल राहुल, हार्दिक पंडय़ा व शिखर धवन यांनी यादरम्यान नेतृत्त्वाची धुरा सांभाळली. याशिवाय, दिनेश कार्तिकला सराव सामन्यात कर्णधारपदाची संधी देण्यात आली होती.
इतके कर्णधार बदलण्याची आवश्यकता का भासली?
या वर्षभराच्या कालावधीत मुख्य खेळाडूंना सातत्याने दुखापती होत राहिल्या आणि काही वेळा एकाच कालावधीत दोन-दोन मालिका आयोजित केल्या गेल्या. एक संघ एका क्रिकेट प्रकारात खेळत असताना दुसरीकडे, दुसरा संघ दुसऱया ठिकाणी दुसरी मालिका खेळत असे. यामुळेही कर्णधार नेमण्याची संख्या वाढली. भारतीय संघ याच वर्षात ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक व मायभूमीत वनडे विश्वचषक खेळणार असून त्या पार्श्वभूमीवर एकच कर्णधार नसणे अर्थातच चिंतेचे राहिले आहे.
नव्या पिढीतील कर्णधाराचा शोध की अद्याप जुन्यावरच भरवसा?
मागील वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेत शिखर धवनकडे टी-20 आणि वनडे क्रिकेट प्रकारात नेतृत्वाची धुरा सोपवली गेली. कारण, त्याचवेळी भारतीय संघाचे इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामने होणार होते. पण, यंदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत रिषभ आणि आयर्लंडविरुद्ध मालिकेत हार्दिक पंडय़ाला कर्णधारपदी नियुक्त केले गेले. जर भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पिढीतील कर्णधाराच्या शोधात असेल तर फक्त या दृष्टीनेच प्रयत्न का झाले नाहीत, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो. उदाहरणार्थ, कारकिर्दीच्या उत्तरार्धाकडे झुकलेल्या शिखर धवनकडे नेतृत्व सोपवून काहीच साध्य होणार नव्हते. उलटपक्षी या वर्षभराच्या कालावधीत 7 कर्णधार नेमण्याऐवजी केवळ तीन-एक कर्णधारांवरच अधिक भरवसा ठेवला असता तर त्यांचे मनोबल उंचावणेही शक्य झाले असते.
सर्वच खेळाडूंना अति क्रिकेटचा फटका
मागील वर्षभरातील अति क्रिकेटचा जवळपास सर्वच खेळाडूंना फटका बसला असून भरगच्च क्रिकेट कार्यक्रमामुळे खेळाडूंना दुखापती होण्याचे प्रमाण वाढले आहे. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत रोहितसह पंत, बुमराह व शमी देखील खेळणार नाहीत. याशिवाय, दीपक हुडा, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड देखील या मालिकेसाठी संघात समाविष्ट नाहीत. मात्र, विंडीजविरुद्ध 16 सदस्यीय संघात त्यांना स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये शेवटची वनडे खेळलेल्या शुभमन गिलला निवडकर्त्यांनी पुन्हा पाचारण केले आहे.
कर्णधारांची यादी
- कर्णधार / प्रतिस्पर्धी / क्रिकेट प्रकार / विजयी / कालावधी
- बुमराह / इंग्लंड / कसोटी / अनिर्णीत / जुलै 2022
- हार्दिक /आयर्लंड / टी-20 / भारत / जून 2022
- रिषभ पंत / द. आफ्रिका / टी-20 / ड्रॉ / जून 2022
- रोहित शर्मा / श्रीलंका / कसोटी / भारत / मार्च 2022
- रोहित शर्मा / श्रीलंका / टी-20 / भारत / फेब्रुवारी 2022
- रोहित शर्मा / विंडीज / टी-20 / भारत / फेब्रुवारी 2022
- रोहित शर्मा / विंडीज / वनडे / भारत / फेब्रुवारी 2022
- केएल राहुल /द. आफ्रिका / वनडे /द. आफ्रिका / जानेवारी 2022
- विराट कोहली / द. आफ्रिका / टेस्ट /द. आफ्रिका / जानेवारी 2022
- विराट कोहली / न्यूझीलंड / कसोटी / भारत / डिसेंबर 2021
- रोहित शर्मा / न्यूझीलंड / टी-20 / भारत / नोव्हेंबर 2021
- विराट कोहली / वर्ल्डकप / टी-20 / भारत बाहेर/ ऑगस्ट-नोव्हें. 2021
- विराट कोहली / इंग्लंड / 4 कसोटी / भारत पुढे / ऑगस्ट-सप्टें. 2021
- शिखर धवन / श्रीलंका / टी-20 / श्रीलंका / जुलै 2021
- शिखर धवन / श्रीलंका / वनडे / भारत / जुलै 2021.