डॉ. निलेश कुलथे : ‘नवहिंद’चा जागृती कार्यक्रम
बेळगाव : मानवी जीवनात तणाव वाढला आहे. त्याचबरोबर चमचमीत आणि तयार खाद्यपदार्थ खाण्यातही वाढ झाली आहे. अनेकजण व्यसनाच्या आहारी गेल्याने शरीरामध्ये अनियमितता येऊन अवयवांमध्ये बिघाड होत असल्याचे माधवबागचे मुंबई विभागाचे वैद्यकीय प्रमुख डॉ. निलेश कुलथे यांनी सांगितले. नवहिंद क्रीडा केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्यविषयक जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी नव्या जीवनशैलीमुळे होणारे आजार आणि त्यापासून मुक्तता मिळविण्याचे उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी सायनेकर होते.
ते पुढे म्हणाले, सध्याची जीवनशैली ही आरोग्यासाठी घातक आहे. माणसाने नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्यास मानवी जीवन निरोगी होऊ शकते. महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष पुरविणे गरजेचे आहे. अॅलोपॅथीची औषधे परिणामकारक आहेत. पण त्यांच्या दीर्घ सेवनाने मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी उपाध्यक्ष आनंद पाटील यांनी गणेशवंदना सादर केली. सेक्रेटरी अनिल हुंदरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. व्यासपीठावर माधवबाग क्लिनिकच्या डॉ. संगीता खांजे, नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन दशरथ पाटील, प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन माधुरी पाटील, महिला प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा नम्रता पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी जिल्हा पंचायतचे माजी सदस्य अर्जुन गोरल, तालुका पंचायतचे माजी सदस्य रावजी पाटील, येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी, ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, रमेश मेणसे, प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर यासह नागरिक उपस्थित होते.