युवा आमदार रोहित पवार यांचे प्रतिपादन : बेळवट्टी येथे आर. एम. चौगुले यांच्या प्रचाराची सभा, नागरिकांचा प्रतिसाद
वार्ताहर /किणये
सीमाबांधवांवर सातत्याने अन्याय, अत्याचार झालेला आहे. रिंगरोडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हिसकावून घेण्याचा कुटिल डाव चालविला जातो. जमिनींवर अतिक्रमण होत आहे. अशा परिस्थितीत शांत बसून चालणार नाही. विविध मार्गातून सीमाबांधवांची गळचेपी करण्यात येते. त्यामुळेच तुमच्यावर जो अन्याय झाला आहे. त्याला उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून द्या, असे मनोगत महाराष्ट्राचे युवा आमदार रोहित पवार यांनी बेळवट्टी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारानिमित्त बेळवट्टी गावात रविवारी सकाळी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीमाबांधवांना व तरुणांना आमदार रोहित पवार हे मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले, सीमाप्रश्नाचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सीमाबांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी धडपडतो आहे. हा लढा खुप महत्त्वाचा असून त्यागाचा, बलिदानाचा आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे. काही जणांनी तुरूंगवास भोगला आहे, लाठ्या खाल्ल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांनी एकजुटीने या लढ्याला बळकटी दिली पाहिजे. कित्येक वर्षापासून हा संघर्ष सुरू आहे. या लढ्यासाठी हुतात्मे झाले आहेत. आपले वाडवडील लढले आहेत. मराठी माणसांवर सातत्याने अन्याय झालेला आहे. सीमाबांधवांचा विचारांचा माणूस विधीमंडळात पाठविणे गरजेचे आहे.
आपले नातेवाईक, मित्रमंडळी तसेच सर्व समाजाला विश्वासात घ्या आणि मोठ्या ताकदीने समितीचे ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. सर्वांनी सीमाप्रश्नाचा लढा जीवंत ठेवला आहात. आता घराघरांमध्ये जा, विनंती करा. ज्या कार्यकर्त्यांची दिशाभूल झाली आहे. त्यांना पुन्हा समीतीच्या प्रवाहात आणा, असे आवाहन केले. म. ए. समितीमधील सध्या गटतट, मतभेद दूर झालेले आहेत. त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा एकजुटीने समितीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा आणि तुमच्या हक्काचा सीमाप्रश्नासाठी लढणारा उमेदवार आर. एम. चौगुले यांना विधानसभेत पाठवा, असेही आमदार रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांची सभा बेळवट्टीतील ग्रा.पं.जवळील वडाच्या झाडाखाली झाली. भुजंग गाडेकर यांच्याहस्ते पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यामुळे परिसर दणाणून गेला होता.
मराठी भाषा आणि संस्कृती ठिकविण्यासाठी समितीचा उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असे डॉ. मधुरा गुरव यांनी आपल्या भाषणातून सांगितले. बेळगाव परिसरात रिंगरोडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच देसूर-नंदीहळ्ळी रेल्वेमार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचविण्यासाठी वेळोवेळी महाराष्ट्र एकिकरण समितीच पुढाकार घेते. त्यामुळे समितीच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे. व चौगुले यांना निवडून दिले पाहिजे, असे नंदीहळ्ळी येथील परशराम कोलकार यांनी सांगितले. ही लढाई मायमराठीच्या रक्षणाची आहे, स्वाभीमानाची आहे. त्यासाठी सर्वांनी समितीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवून आपला आवाज बुलंद करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे, असे जिल्हा पंचायत माजी सदस्या सरस्वती पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्या प्रेमा मोरे, बी. बी. देसाई, अॅड. सुधीर चव्हाण, मनोहर किणेकर व इतर कार्यकर्त्यांची भाषणे झाली. बेळवट्टी येथे एम. के. नलवडे, सातेरी चौगुले, सातेरी पाटील, मनोहर होसूरकर, ज्ञानेश्वर चौगुले, जनार्दन पाटील, अनिल चांदीलकर, सातेरी चांदीलकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इनाम बडस-बाकनूर गावात प्रचार
इनाम बडस गावात चौगुले यांची प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी प्रकाश सुतार, रवळू राऊत, दशरथ सूर्यवंशी, नारायण पाटील आदेंसह गावकरी उपस्थित होते. बाकनूर गावात चौगुले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या गावातूनही चौगुले यांना पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. ग्राम पंचायत अध्यक्ष म्हाळू मजुकर, नारायण गोडसे, विठ्ठल मजुकर, नाना मजुकर, रवळू गोडसे, विठ्ठल गोडसे, निंगो कुलम, रवळू पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.