जीएसएसमध्ये डॉ.उदय निरगुडकर यांचे व्याख्यान
प्रतिनिधी/बेळगाव
जीएसएस कॉलेजमध्ये ‘बॉर्न टू विन’ या विषयावर डॉ. उदय निरगुडकर यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर एसकेई कॉलेज कमिटीच्या चेअरपर्सन प्रा. माधुरी शानभाग, प्राचार्य बी. एल. मजुकर उपस्थित होते. प्रारंभी लता लक्ष्मेश्वर यांनी स्वागतगीत सादर केले. प्रा. अरविंद हलगेकर यांनी स्वागत केले. डॉ. संदीप देशपांडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
यावेळी निरगुडकर म्हणाले, कोरोनाचा काळ हा नवनिर्मितीचा काळ होता. या काळात विविध उपाय कमित कमी खर्चात उपलब्ध झाले. अलेक्सा मशीनसारख्या उपकरणांचा शोध याच काळात लागला. वैद्यकीय शाखेने कोरोनाची लस व कोरोना चिकित्सा संचची भारतातच निर्मिती केली. म्हणजेच या काळात भारतीयांची संशोधन वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली.
भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यांनी आपल्या संपत्तीची लुट केली. परंतु भारतीयांची ज्ञानलालसा त्यांना लुटता आलेली नाही, असेही ते म्हणाले. आत्मनिर्भर भारत, शास्त्रज्ञांची भरारी, मंगळयान व चांद्रयान दरम्यान महिलांची कौतुकास्पद कामगिरी याबद्दलही त्यांनी विचार मांडले. प्रा. माधुरी शानभाग यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन प्रा. चारुशिला बाळीकाई यांनी केले. प्रा. अनिल खांडेकर यांनी आभार मानले.