दरवषी या दिवसात मुलांच्या दहावीच्या परीक्षा संपतात आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुऊवात होते. हा काळ प्रत्येक मुला मुलीच्या आयुष्यातील सुवर्णकाळ असतो. या टप्प्यात, मुले प्रौढत्वाच्या मार्गावर चालू लागतात. शाळेत शिकत असताना ते एका सुरक्षित वातावरणात असतात जिकडे त्यांना मार्गदर्शन करायला त्यांचे आई वडील, शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी त्यांच्या पाठीशी उभे असतात. पण आता कॉलेजमध्ये पदार्पण करण्याआधी अचानक एक वेगळीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडलेली असते. परंतु वाढत्या स्पर्धेमुळे, आयुष्याच्या या नवीन टप्प्याचा आनंद घेण्याऐवजी मुलांना अनेकदा दडपण येऊ लागते.
आयुष्याच्या स्पर्धेत प्रत्येक जण प्रथम येऊ इच्छितो. सर्व सुखसुविधा, कौशल्य, आणि आनंद आपल्याला मिळावा यासाठीच माणूस झटापट करत असतो. आणि या स्पर्धेचा दबाव आजकाल मुला-मुलींमध्ये अधिक दिसतो. त्यामुळे बालपण ते प्रौढत्व या स्थित्यंतराचा आनंद घेण्याऐवजी मुलांना या नव्या टप्प्याची भीती वाटू लागली आहे.
दहावी पूर्ण करण्याआधीच त्यांना त्यांच्या उद्योगाची, त्यांच्या भविष्याची आणि एकंदर आयुष्याची काळजी वाटू लागते. मग त्या दबावाखाली येऊन विद्यार्थी फक्त पैसे कमावण्यासाठी लोकप्रिय विषय जसे की विज्ञान(सॉफ्टवेअर), गणित, वैद्यकीय क्षेत्र इत्यादी विषयांमध्ये आपली कारकीर्द निवडतात. इतकी वर्षे विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन क्षेत्रांमध्ये खूप भेदभाव केला गेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दहावीनंतर विज्ञान क्षेत्र निवडण्याची ओढ लागून रहायची कारण लहानपणापासून मुलांच्या मनात हेच बिंबवले जाते की त्यांची उन्नती फक्त विज्ञान क्षेत्रामधेच होईल. त्यामुळे आवड नसतानादेखील, मुले भविष्य सुरक्षित करण्यासाठी विज्ञान क्षेत्र निवडतात.
आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी दहावी पूर्ण केली आहे, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन क्षेत्रांपैकी एका क्षेत्राची निवड करण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता. त्यातसुद्धा विज्ञान हे भारतामध्ये नेहमीच लोकप्रिय असलेले क्षेत्र आहे आणि त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संगणक विज्ञान या विषयांचा समावेश होतो. तसेच, वाणिज्य हे भारतातील आणखी एक लोकप्रिय क्षेत्र आहे ज्यामध्ये लेखा, वित्त, अर्थशास्त्र आणि व्यवसाय व्यवस्थापन यासारख्या विषयांचा समावेश आहे. कला हे एक क्षेत्र आहे जे नेहमीच भारताच्या संस्कृतीचा आणि वारशाचा अविभाज्य भाग आहे. यात ललित कला, संगीत, नृत्य, रंगमंच आणि चित्रपट निर्मिती यासारख्या विषयांचा समावेश आहे.
पण इतके दिवस कला आणि वाणिज्य या क्षेत्रांना हवी तेवढी मान्यता मिळाली नाही. वाणिज्य आणि कला क्षेत्र निवडलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल नाही, या क्षेत्रांमध्ये विज्ञान क्षेत्राएवढी प्रगती नाही असे बरेच गैरसमज आत्तापर्यंत समाजामध्ये पसरले आहेत. पण आता, याच शिक्षणप्रणालीमध्ये बदल होताना आपण बघणार आहोत. विज्ञान हे एक क्षेत्र आहे ज्यासाठी भरपूर ज्ञान आणि बुद्धिमत्ता आवश्यक आहे असे मानले जात असताना, समाजात इतर क्षेत्रे वेगाने विकसित होत आहेत. विज्ञान हे एकमेव यशस्वी क्षेत्र आहे हा समज हळूहळू बदलत आहे.
इतर अनेक देशांमध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कलासारख्या क्षेत्रांसाठी विद्यार्थ्यांकडे विषयांचा विशिष्ट गट नाही. विद्यार्थी मानसशास्त्र किंवा त्यांच्या आवडीच्या इतर कोणत्याही विषयासह वाणिज्य विषयाचादेखील अभ्यास करू शकतो. विद्यार्थ्यांना आवड असलेले विषय निवडण्याचे स्वातंत्र्य देणे महत्त्वाचे आहे. कारण भौतिकशास्त्र आवडणारा प्रत्येकजण रसायनशास्त्रात चांगला असेलच असे नाही. अगदी विज्ञान क्षेत्रदेखील एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये विभागलेले आहे. वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकी हे दोन्ही विज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना कार्यान्वित करण्यासाठी समान प्रकारची बुद्धिमत्ता आवश्यक आहे.
मानवी मन इतके जटिल आणि वैविध्यपूर्ण आहे की ते एका विशिष्ट बुद्धिमत्तेच्या श्रेणीमध्ये बसू शकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाचा समावेश केल्याने, शिक्षण यापुढे वेळ किंवा स्थानानुसार मर्यादित नसून, तंत्रज्ञान-वर्धित, वैयक्तिकृत आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणाचे युग झाले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2023 पासून सक्रिय होणार आहे, ते विद्यार्थाना या रूढींना तोडण्यास मदत करेल आणि भारतातील शिक्षणाचा चेहरामोहरा खरोखर बदलेल.
हे बघून खूप वाईट वाटते की देशाचे भविष्य घडविणारी पिढी आज इतक्मया तणावाखाली आणि एवढ्या स्पर्धेमध्ये जगत आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयाची आवड असेल, तर त्याला त्याच्या क्षेत्रात यश नक्की मिळेल. त्यासाठी जगमान्य क्षेत्रच निवडले पाहिजे किंवा स्पर्धेचा भाग व्हायलाच पाहिजे असे नाही.
पालकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या स्वप्नांचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित करावे. त्यांनी मुलांना त्यांच्या आवडी-निवडी जाणून घ्यायला शिकवले पाहिजे. कारण तुम्हाला एखादी गोष्ट खरोखर आवडली तरच तुम्ही त्यामध्ये उत्कृष्ट ठराल. विज्ञान, वाणिज्य किंवा कला या क्षेत्रांमध्ये आज फारसा फरक राहिलेला नाही. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक शिक्षणाच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. आपली कौशल्ये आणि बुद्धिमत्ता समजून घेणे आणि आपण जे काही करता त्यात सर्वोत्तम बनणे अधिक महत्त्वाचे आहे. यश त्यांना मिळेल जे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्र्रम करतात. आता जर परिश्र्रम हा जीवनाचा नियम आहे तर अशा क्षेत्रात करियर करणे व्यावहारिक आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ऊची आहे. ज्येष्ठांनी विद्यार्थ्यांना सामाजिक नियमांचे आंधळेपणाने पालन करण्याऐवजी त्यांची आवड शोधण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
कारण माणूस खरोखर यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा तो मनापासून आनंदी असतो. आणि हा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तो त्याच्या आवडीचे काम करून त्यात यश मिळवतो. त्यामुळे दहावी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने विज्ञान, कला की वाणिज्य याचा विचार करण्याऐवजी आपल्याला नक्की कोणत्या विषयात रस आहे हे शोधून जर पुढचे पाऊल उचलले तर तो नक्कीच यशस्वी होण्याबरोबरच एक आनंदी व्यक्तीदेखील बनेल!
-श्राव्या माधव कुलकर्णी