मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा समोर आलेला प्रकार म्हणजे क्रौर्याचा कळसच म्हटला पाहिजे. गेल्या जवळपास अडीच महिन्यांपासून मणिपूर जळत असून, मैतेई आणि कुकी समुदायातील वांशिक हिंसाचारात आत्तापर्यंत 150 हून अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत. आता 4 मे 2023 रोजी जमावाने महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार केल्याची माहिती एका व्हायरल व्हिडिओद्वारे पुढे आल्याने येथील हिंसाचाराने वेगळे वळण घेतल्याचे पहायला मिळते. त्यामुळे येथील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेले राज्य व केंद्र सरकार आता काय कृती करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ईशान्य भारतातील मणिपूर हे महत्त्वाचे राज्य. मैतेई आणि कुकी हे येथील प्रमुख दोन समाज असून, त्यांच्यात अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या दुभंगातून हे टोक गाठल्याचे दिसून येते. खरे तर 2016 पासूनच मणिपूर धुमसते आहे. मात्र, भाजपाने ‘नागा करारा’चा घाट घातल्यानंतर परिस्थिती अधिक बिघडली असून, आता तर या साऱ्याचा कडेलोट झाल्याचे दिसते. डोंगराळ भागात कुकी, तर खोऱ्याच्या भागात मैतेई समाज अशी मणिपूरमधील साधारण विभागणी. जमीन-खरेदी विक्री अधिकारांबाबतची असमानता, तसेच आरक्षणाचा मुद्दा यातून येथील वातावरण बिघडल्याचे सांगण्यात येते. तथापि, ढिम्म प्रशासन व तेथील राजकीय नेतृत्वाचा उद्दामपणाचाही यात प्रमुख वाटा आहे. बिरेन सिंह यांच्याकडे या राज्याची धुरा आहे. सिंह हे मैतेई समाजाचे आहेत. खरे तर मुख्यमंत्रिपदावरील व्यक्ती ही कोणत्या समाजाची नव्हे, तर तेथील समस्त जनतेचे प्रतिनिधीत्व करीत असते. दुर्दैवाने सिंह याला अपवाद ठरतात. मैतेई समाजाचीच बाजू उलचून धरणे, त्यांच्या कुकृत्यातही त्यांच्या पाठीशी उभे राहणे, यात ते मागे हटताना दिसत नाहीत. त्यामुळे कुकी समाज नेतृत्वावर विश्वास ठेवत नसेल, तर त्यांना दोष कसा देणार? आत्तापर्यंत मणिपुरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अन्यत्र स्थलांतर केले असून, यात अर्थातच कुकींची संख्या अधिक आहे. बळी गेलेल्यांमध्येही याच समाजाचे लोक सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. आता हा संघर्ष महिलांपर्यंत पोहोचल्याने मणिपूरमध्ये खरोखरच कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल उत्पन्न होतो. शेकडोंचा समावेश असलेला जमाव आक्रमक काय होतो, दुसऱ्या वस्तीवर हल्ला काय करतो, पोलीस बंदोबस्तातून दोन महिलांना वेगळे काय करतो, त्यांची नग्न धिंड काय काढतो, हा सगळा प्रकारच मुळात देशाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारा होय. त्यामुळे पंतप्रधानांनी 2 महिने 17 दिवसांनी याबाबतचे आपले मौन सोडले हे बरे झाले. पंतप्रधान मध्यंतरी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊन आले. फ्रान्सचा दौराही त्यांनी आटोपला. पंतप्रधानपदावरील व्यक्तीला अहोरात्र काम करावे लागते. देशहितास्तव जगभ्रमंती करावी लागते, यात कोणताही संदेह नाही. परंतु, देशातील मणिपूरसारख्या राज्यात आगडोंब उसळलेला असतानाही ते स्थितप्रज्ञ अवस्थेत राहतात, हे अनाकलनीयच. वास्तविक सिंह यांच्यासारख्या राजकारण्यांचे फावले ते यामुळेच. त्यांचा राजीनामा घेण्याचा कणखरपणा नेतृत्वाने दाखविला असता, तर ते संयुक्तिक ठरले असते. आज त्यांना अभय दिल्यामुळेच या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. मणिपूरमधील घटना कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद असून, माझे मन दु:खाने व क्रोधाने भरल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच कठोर कारवाईचाही इशारा दिला आहे. असे असले, तरी आपपरभाव बाळगणाऱ्या व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन समाजातील अंतर वाढविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सिंह यांचा राजीनामा घेणार का, याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. तसे काल परवाचे मणिपूर हे शांतच होते. वादाची फोडणी मिळाली, ती अलीकडेच. यातून या राज्याचा एकूण सारा समतोलच बिघडण्याचा धोका संभवतो. म्हणूनच राज्याची स्थिती लवकरात लवकर नियंत्रणात कशी आणता येईल, असा प्रयत्न असायला हवा. मुख्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात सरकारला फटकारले आहे. इतिहासात जगभरात महिलांचा शस्त्रासारखा वापर करण्यात आला आहे. मात्र, जातीय तणावग्रस्त भागात हिंसाचार घडविण्यासाठी असा वापर करणे दु:खदायक आणि पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. या व्हिडिओमुळे आम्ही कमालीचे व्यथित झालो असून, सरकारने यावर तातडीने कारवाई करावी. अन्यथा, आम्हीच अॅक्शन घेऊ, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र व राज्य सरकारला सुनावले आहे. अखेर न्यायालयानेच कान टोचले, ते बरे झाले. मुळात मणिपूरचा प्रश्न हाताळण्यात दोन्ही सरकारे साफ अपयशी ठरली आहेत. वेगवेगळ्या योजना आणणे, त्यांना आकर्षक नावे देणे, यात सत्ताधारी पक्षाचा हातखंडा आहे. ‘बेटी बचाओ’चा नाराही असाच ढोल वाजवत देण्यात आला होता. मात्र, देशातील मुली सुरक्षित नसल्याचेच मणिपूरच्या घटनेतून अधोरेखित झाले आहे. मणिपूरमधील घटनेनंतर राजस्थान व अन्य राज्यांतील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सत्ताधारी वर्गातून उपस्थित करण्यात येत आहे. याला निव्वळ पलायनवाद, असे म्हणता येईल. मणिपूरला जे झाले, ते सबंध जगापर्यंत पोहोचले. आपल्या संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या देशातील स्थिती काय आहे, हे यातून जगासमोर आले. खरे तर समस्त देशवासीयांकरिताच ही अत्यंत लज्जास्पद व घृणास्पद घटना आहे. म्हणूनच या प्रकरणात कुणालाही दया माया दाखविली जाता कामा नये. संबंधितांची ओळख पटवून जे कुणी दोषी असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यत्र नार्येस्तू पुज्यन्ते । रमन्ते तत्र देवता ।। असे संस्कृत वचन आहे. जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, तेथे देवता निवास करतात, हा त्याचा अर्थ. ही वचने केवळ ग्रंथात न राहता समाजाच्या मानसिकतेत उतरण्यासाठीही प्रयत्न हवेत.