रविवारी पहाटे पाचपर्यंत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम : शहरात पाणीटंचाई
बेळगाव ; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलवाहिनीला जॅकवेलजवळ गळती लागली. त्याचप्रमाणे लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या खराब झाल्याने पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून काही भागात पाणी आले नसल्याने जलवाहिन्यांच्या गळतीचा फटका शहरवासियांना बसत आहे. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या जलवाहिनीला शनिवारी सकाळी कुंदरगी परिसरातील जॅकवेलजवळ गळती लागली. रविवारी सकाळी पहाटे पाचपर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात आले.
जलवाहिन्यांच्या गळत्यांमुळे पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे कोलमडले असून एलअॅण्डटी कंपनीदेखील हैराण झाली आहे. एका गळतीचे निवारण होते न होते तोच दुसरीकडे गळती लागत आहे. काही ठिकाणी गळती निवारणासाठी रस्ता खोदाई करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे गळतीचे निवारण करण्यास विलंब होत आहे. पण याचा फटका शहरवासियांना बसत आहे. मागील महिनाराभरापासून जलवाहिन्यांच्या गळत्या निवारणाचे काम एलअण्Ÿडटीकडून करण्यात येत आहे. गळती निवारणाचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करताच पुन्हा नव्या गळत्या होत आहेत. 30 वर्षांपूर्वी घालण्यात आलेल्या जलवाहिन्यांची क्षमता संपुष्टात आली आहे.
विद्युतपुरवठा खंडित झाल्याने जलवाहिन्यांना गळती
हिडकल जलाशयाच्या जलवाहिनीला शनिवारी सकाळी कुंदरगी परिसरातील जॅकवेलजवळ गळती लागली. विद्युतपुरवठा खंडित केला जात असल्याने जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रकार वाढले आहेत. तर सहा वर्षांपूर्वी या ठिकाणी गळती लागली होती. त्याच ठिकाणी शनिवारी सकाळी जलवाहिनी फुटली असल्याचे एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दुरुस्तीसाठी जलवाहिनीतील पाणी पूर्णपणे रिकामी करण्यात आले. त्यानंतर दुरुस्तीचे काम केले. रविवारी सकाळी पहाटे पाचपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर कुंदरगी येथील जॅकवेलचा पंप सुरू करण्यात आला. हिडकल ते बेळगाव जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सहा विद्युत पंप बसविण्यात आले आहेत. तर टप्प्याटप्प्याने हे विद्युत पंप सुरू केले जातात. तर पहिला विद्युत पंप सुरू केल्यानंतर बेळगावला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोचण्यास चार ते पाच तासांचा अवधी लागतो. या दरम्यान, पुन्हा विद्युतपुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठा होण्यास विलंब लागतो. अशाप्रकारे तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा करण्यास त्रास होत असल्याचे एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हिडकलहून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आल्यानंतर त्या ठिकाणी सहा टाक्या असून या सहा टाक्यांमध्ये एकाच लेव्हलमध्ये पाणी सोडले जाते. याकरितादेखील बराच विलंब लागतो. रिकामी झालेल्या जलवाहिन्या भरण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागतो. त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचते. एका गळती निवारणानंतर पाच तास वेळ अशा प्रकारे निघून जातो. त्यामुळे याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी पाणीपुरवठा मंडळाकडून जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम केले जात होते. ती व्यवस्थित दुरुस्ती झाली नसल्यामुळे जलवाहिन्यांना गळती लागत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठ्याचा गोंधळ सुरूच असून सुरळीत पाणी मिळत नसल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढल्या असून पाण्याची गरज वाढली आहे. अशातच पंधरा दिवसांपासून पाणी नसल्याने शहरवासियांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीसमस्या निर्माण झाली असून गळत्यांमुळेच या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे एलअॅण्डटी कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.
टँकरची संख्या वाढविण्याची गरज
पाणीसमस्या निवारणासाठी एलअॅण्डटीकडून चार टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षिण आणि उत्तर विभागात प्रत्येकी दोन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पण शहराच्यादृष्टीने टँकरची संख्या खूपच कमी आहे. सध्या सातत्याने गळती लागून पाणीपुरवठा बंद होत असल्याने टँकरची संख्या वाढविणे आवश्यक आहे. महापालिकेचे दोन टँकर असून एक टँकर नादुरुस्त असल्याने बंद आहे. तर एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पण महापालिकेचे काम संपल्यानंतर सर्वसामान्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे एलअॅण्डटी कंपनीच्या चार टँकरद्वारे शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरची संख्या वाढविण्याकडे एलअॅण्डटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. यापुढे पाणीटंचाई सातत्याने निर्माण होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासन आणि एल अँड टी कंपनीने टँकरची संख्या वाढवून पाणी समस्येचे निवारण करावे. तसेच सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.