मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे प्रतिपादन, डिचोलीत ओणम उत्सव मोठय़ा उत्साहात. राजा महाबलीच्या आगमनाने चैतन्य.
डिचोली/प्रतिनिधी
आपल्या देशातील प्रत्येक राज्यांमध्ये साजरे होणारे पारंपरिक सण उत्सव म्हणजे सर्व धर्मांतील लोकांना एकत्रित आणून सामाजिक बांधिलकी व सलोखा जपण्याची प्रेरणा देणारे क्षण असतात. या उत्सवांतील परंपरा व संस्कृती पुढील पिढीमध्ये रूजवून त्याचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. ओणम हा एक महत्वाचा आणि सर्वत्र भरभराट आणणारा उत्सव आहे. राज्यातील केरळी बांधव हे आज या राज्याचाच एक भाग बनले असून गोव्यात राहून त्यांना केरळी असे संबोधणे गैर आहे. या राज्याच्या विकासात त्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन तथा मच्छीमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यां?नी डिचोली येथे केले.
बोर्डे डिचोली येथील महामाया मंदिराच्या सभागृहात केरळी बांधवांच्या कल्पका सांस्कृतिक असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “ओणम” उत्सवात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़?, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, अखिल गोवा मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष वासू नायर, कल्पका सांस्कृतिक असोसिएशनचे अध्यक्ष पि. व्ही. जयप्रकाश, सचिव प्रसाद नायर, पि. व्ही. श्रीकुमार व इतरांची उपस्थिती होती.
केरळी बांधव आज संपूर्ण जगभरात पसरलेले असून आपल्या कल्पक बुध्दीने ते आपापल्या क्षेत्रात चांगले योगदान देत आहेत. त्यां?नी गोव्यातील सामाजिक पातळीवर चांगले काम केले आहे. असेही मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी म्हटले.
केरळी लोकांनी गोव्यातील लोकांशी संबंध आणि सलोखा राखला आहे
ओणम हा केरळ राज्याचा मोठा उत्साहाचा आणि चैतन्यचा उत्सव आहे. हा उत्सव गोव्यात मोठय़ा उत्साहात साजरा होत असल्याने गोव्यातही महाबली राजाचे आगमन पहायला मिळते. गोवा केरळी लोकांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहिल. गोव्यात चांगले काम करत असताना लोकांशी असलेले संबंध व सलोखा कायम राखलेला आहे, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? म्हणाले. यावेळी आमदार शेटय़? यांनी आपल्या तामीळनाडू राज्यातील आठवणी सांगताना चक्क तामीळ भाषेत भाषण करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.
केरळी लोकांचे सामाजिक पातळीवरही योगदान
ओणम हा एक केरळी बांधवाचा मोठा सण असून तो गोव्यात आणि डिचोलीत होत असल्याने डिचोलीसाठी मोठा अभिमान आहे. केरळी बांधवांचे गोव्यासाठी मोठे योगदान आहे. तसेच गोव्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करताना गोवेकरांनाही सतत मदत करण्यासाठी ते तत्पर असतात. हा त्यांचा स्वभाव राज्याच्या विकासात भर घालत आहे. असे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी सांगितले..
केरळी गोव्यात राहून गोमंतकीयच बनले आहेत
गोवा व केरळी लोकांचे संबंध दृढ असून गोव्यात केरळातील मोठय़ा संख्येने लोक आज आपल्या नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असून आज आम्ही गोव्यात राहत असल्याने खरेच गोमंतकीय बनले आहेत. गोवा केरळ यांच्यात खुप साम्य असल्याने या भुमीला आज आम्ही आपलेच मानून कार्य करीत आहोत, असे यावेळी अखिल गोवा मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष वासू नायर म्हणाले.
या कार्यक्रमात पोक्कलम या फुलांची रांगोळी स्पर्धेत प्रथम प्रणव व गट, दुसरे मंजू व गट, तर तिसरे दिशीन व गट यांना मान्यवारांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच राज्यात स्थायिक असलेल्या व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या दिनेश चेराशेरी, अखिल गोपालकृष्णन, इनासा, अश्विनी मोहनन, अन्वति संदीप बांदेकर यांचा मंत्री निळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते सत्कर करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्वागत कल्पका असोसिएशनचे अध्यक्ष पि. व्ही. जयप्रकाश यांनी केले. सचिव प्रसाद नायर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सूत्रसंचालन इनासा यांनी केले. आभार. पि. व्हि. श्रीकुमार यांनी मानले.
ओणम उत्सवात मोठा उत्साह, केरळी संस्कृतीचे घडले दर्शन
कोवीड महामारीमुळे गेली दोन वर्षे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यावषीच्या उत्सवात वेगळाच उत्साह होता. या दोन दिवशीय ओणम उत्सवात विविध सांस्कृतिक व कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “पोक्कलम” या फुलांची रांगोळी घालण्याच्या स्पर्धेत केरळी बांधवांनी आकर्षक फुलांची रांगोळी घातली होती. गेली 29 वर्षे महाबली राजाचा पेहराव करून या उत्सवात वेगळेच आकर्षण निर्माण करणारे जेम्स टी अँथनी यांनी यावषीही आपली भुमिका चांगल्याप्रकारे वठवली. औपचारिक कार्यक्रम संपताच “ओणसध्या” या खास केरळी पारंपरिक भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी लोकांना लाभली. खास केळीच्या पानावर केरळी पध्दतीने विविध गोड, आंबट, तिखट पदार्थ तसेच उकडा भात व सांभार, खीर अशा या भोजनाचा आस्वाद उपस्थिती लोकांनी घेतला. विशेष केरळी पोषाख परिधान करून सर्व केरळी बांधव या उत्सवात सहभागी झाले होते.