महाराष्ट्रातील शिवसेना- भाजप सरकारला पाठींबा देण्यासाठी अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरूद्ध जाहीर बंड केल्यानंतर प्रथमच, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गडचिरोलीमध्ये एकत्र मंचावर आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि अजित पवार याच्या पाठींब्यामुळे महाराष्ट्रात आता विकासाचे त्रिशुल आले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बंडखोरांच्या विरोधात लढण्यासाठी आपला राजकिय राज्यव्यापी दौरा नाशिकमधल्या येवला येथून सुरू केला. त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आहोत. पण अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने आता विकासाचे ‘त्रिशूल’ निर्माण झाले आहे. हे विकासाचे त्रिशूल राज्यातील गरिबी आणि मागासलेपण दूर करेल.” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, “हे ‘त्रिशूल’ भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्यासारखे असून यामुळे सामान्य माणसाच्या विरोधात काम करणार्यांची राख होईल.” असेही ते म्हणाले. अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांना पाठींबा देणाऱ्या आठ आमदारांनाही शिंदे- फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आली.