नांद्रे प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील नांद्रे गावात एका बिबट्यासदृश प्राण्याने शेळींवर हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे 15 ते 20 हजाराचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे वनविभागाने केलेल्या पंचनाम्यात हा बिबट्या नसून बिबट्य़ा सदृश प्राणी असल्याचे म्हटले आहे.
या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, गेले काही दिवस नांद्रे परिसरामध्ये बिबट्या किंवा बिबट्यासदृश प्राणि फिरत असल्याच्या चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत्या. दोन आठवड्यापूर्वी गावातील शेतकऱ्यांना राञी बिसूर रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले होते. बिबट्या परिसरात फिरत असल्याचा व्हिडीओही सोशल मीडीयात फिरत होता.
काल मध्यराञी शरद पाटील नगरमधील आदम मुल्ला यांच्या दोन शेळ्यावर बिंबट्याने हल्ला करून ठार केले. तर एक बोकड पळवून नेले. ही घटना सकाळी निदर्शनास आल्यानंतर वनविभागाला याची माहीती देण्य़ात आली. वनविभाग घटनास्थळी पोहचताच त्यांनी पंचनामा केला आणि हा हल्ला बिबट्याचा नसून कुत्रा अथवा इतर प्राण्याने केला असल्याचा दावा केला. पण शेतकऱ्यांकडून हा बिबट्याच असल्याचे वनविभागाला सांगण्यात येत आहे. वनविभागाच्य़ा या दाव्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून शेती कामासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.