छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर नक्षलींकडून गोळीबार ः दुचाकींचीही जाळपोळ
वृत्तसंस्था / राजनांदगाव
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर माओवाद्यांनी भ्याड कृत्य केले आहे. येथे नक्षलवाद्यांनी कर्तव्यावर तैनात असलेल्या जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तपासणी नाक्यावर सेवा बजावत असतानाच नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. याशिवाय नक्षलवाद्यांनी जवानांच्या दुचाकीही जाळल्या आहेत. घटनेनंतर नक्षलवादी फरार झाले आहेत. ही घटना छत्तीसगड राज्यातील बोरतलाब पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून सदर भाग महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हय़ाशी संलग्न आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गत सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास नक्षली हल्ल्याची घटना घडली. महाराष्ट्र सीमेच्या चेकपोस्टपासून सुमारे 50 मीटर अंतरावर नक्षलवाद्यांच्या एका समुदायाने जवानांवर बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे.
बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह आणि ललित यादव आपल्या एका सहकाऱयासह मोटारसायकलने चहा पिण्यासाठी पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले असता दबा धरुन बसलेल्या नक्षलींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस कर्मचाऱयांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर एक पोलीस कर्मचारी जखमी आहे. जखमी पोलीस कर्मचाऱयांमुळे सदर घटना पोलिसांना मिळाल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलींनी तेथील दुचाकींना आग लावून घटनास्थळावरुन पोबारा केला. या घटनेनंतर मोबाईल चेकपोस्टवर अतिरिक्त जवान तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जंगलाच्या बाजूने नक्षलवादी अचानक आले. यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला. यादरम्यान जवानांना प्रत्युत्तर देण्याची संधीही मिळाली नाही. या हल्ल्यात कॉन्स्टेबल राजेश प्रतापसिंह आणि कॉन्स्टेबल ललित यादव यांचा मृत्यू झाल्याचे नक्षल ऑपरेशन विभागाचे डीएसपी अजित ओगरे यांनी सांगितले. बोरतलावमध्ये नक्षलवाद्यांच्या अस्तित्वाच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत.
मुख्यमंत्री बघेल यांनी व्यक्त केला शोक
नक्षलवादी हिंसाचारात दोन जवान हुतात्मा झाल्याबद्दल मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचाऱयांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही, असे बघेल यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना स्पष्ट केले. त्याचबरोबर माजी मंत्री राजेश मुनत यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. नक्षली हल्ल्यात जवान हुतात्मा होणे अत्यंत दुःखद आहे. हुतात्मा जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असे ते म्हणाले.