रोज 100 च्या वर रुग्ण सापडत असल्याने चिंता
प्रतिनिधी /पणजी
राज्यात खूप दिवसानंतर गेल्या 24 तासात म्हणजे रविवारी कोरोनाचे 2 बळी गेल्यामुळे एकूण मृतांचा आकडा वाढून 3835 वर पोहोचला आहे. यापूर्वी तो 3833 वर स्थिर राहिला होता. दिवसभरात 112 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून त्यातील एका रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले तर 111 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 78 जणांची कोरोनातून सुटका झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
खूप दिवसांनी 2 बळी गेल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली असून अजूनही रोज सरासरी 100 पेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात 950 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील 112 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आणि त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत असला तरी प्रतिदिन 100च्या वर नवे रुग्ण सापडत असल्याचा कल समोर येत आहे.
आतापर्यंत मिळून एकूण 248041 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 243278 जणांना कोरोनातून मुक्तता मिळाली आहे. सक्रिय रुग्णसंख्या 900 पेक्षा जास्त झाली असून 928 वर पोहोचली आहे परंतु अजून सरकारने त्याची कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही.