भारतातील धक्कादायक आकडेवारी ः तामिळनाडूत सर्वाधिक अपघातांची नोंद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विकासाच्या मार्गावर वेग पकडणाऱया देशात वाहनांची संख्या अन् रस्त्यांची लांबीही वाढत आहे. परंतु रस्ते दुर्घटना आणि त्यात बळी पडणाऱयांची संख्याही वाढत आहे. भारतात मागील वर्षी रस्ते दुर्घटनांमध्ये होणाऱया मृत्यूंची संख्या वाढली आहे. या रस्ते दुर्घटनांमध्ये दुचाकी वाहने सर्वाधिक बळींचे कारण ठरत आहेत. 2021 या साली 44.5 टक्के मृत्यू हे दुचाकी वाहनांमुळे झाले आहेत. या वाहनांमुळे मागील वर्षी देशात 69,240 जणांनी जीव गमावला आहे.
2020 च्या तुलनेत 2021 मध्ये रस्ते दुर्घटनांमध्ये पडणाऱया बळींच्या संख्येत 16.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. एनसीआरबीनुसार प्रति 1 हजार वाहनांमागे रस्ते दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. 23,531 लोकांचा मृत्यू रस्त्यांवरील कार दुर्घटनांमुळे झाला आहे. मार्ग दुर्घटनांमधील एकूण बळींच्या तुलनेत हे प्रमाण 15.1 टक्के इतके होते.
मागील वर्षी ट्रकांमुळे झालेल्या अपघातात 14,622 जणांना जीव गमवावा लागला आहे. हे प्रमाण एकूण बळींच्या तुलनेत 9.4 टक्के आहे. मध्यप्रदेशात यामुळे सर्वाधिक लोकांचा (23.4 टक्के) मृत्यू झाला आहे. मागील वर्षी तामिळनाडूत 57,090 रस्ते दुर्घटनांची नोंद झाली असून हा आकडा देशात सर्वाधिक ठरला आहे. तर 2020 मध्ये तामिळनाडूत रस्ते दुर्घटनांचे प्रमाण 46,443 इतके होते.
मागील वर्षी भारतातील रस्त्यांवर बसेसमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 3 टक्के बळी गेले आहेत. मध्यप्रदेशात रस्ते दुर्घटनांमध्ये 49,493 जणांचा मृत्यू झाला आहे. 2020 च्या तुलनेत हे प्रमाण 6,133 ने अधिक आहे. उत्तरप्रदेशात 2021 मध्ये 2020 च्या तुलनेत 5,916 अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.