माहिती पुनर्स्थापित करण्यात यश मिळाल्याने दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संगणकांवर झालेला सायबर हल्ला चीनकडूनच करण्यात आला होता, ही बाब आता उघड झाली आहे. चीनने 100 हून अधिक संगणकांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, केवळ पाच संगणकांमध्ये चिनी मालवेअरचा प्रवेश झाला होता. आता या सर्व संगणकांमधील माहिती पुनर्स्थापित करण्यात यश आले आहे.
23 नोव्हेंबरपासून पुढचे काही दिवस आयुर्विज्ञान संस्थेचे काही संगणक निकामी झाले होते. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. या संगणकांमध्ये मालवेअर घुसविण्यात आले आहे, असे तपासाअंती स्पष्ट झाले. हे मालवेअर चीनकडूनच घुसविण्यात आल्याचेही उघड झाले होते. चीनने अनेक संगणकांवर असा सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, अनेक संगणकांमध्ये बसविण्यात आलेली संरक्षक व्यवस्था भेदण्यात त्याला यश आले नाही. केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच संगणक या हल्ल्याला बळी पडले होते.
या हल्ल्यामुळे काही काळ दिल्लीतील या संस्थेच्या मुख्यालयातील बाहय़ रुग्ण आणि अंतर्गत व्यवस्थेतील (आऊट पेशंट आणि इन पेशंट विभाग) संगणकीय कार्य खंडित झाले होते. सँपल कलेक्शन विभागातील कार्यही प्रभावित झाले होते. चीनच्या सायबर हल्ल्यामुळे एम्सची स्मार्टलॅब, बिलिंग व्यवस्था, अहवाल निर्मिती, नियुक्ती व्यवस्था इत्यादी डिजिटल व्यवस्थांवर परिणाम होऊन त्यांची गती कमी झाली होती. आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) त्यासंबंधी अहवालही सादर केला होता.
आता सर्व सुरळीत
मात्र, डिसेंबरच्या प्रथम सप्ताहापासून या संस्थेची सर्व संगणकीय व्यवस्था सुरळीत होण्यास प्रारंभ झाला. पुढील काही दिवसांमध्ये प्रभावित संगणकांमधील मालवेअर काढण्यात यश आले. आता कामकाज पूर्णतः व्यवस्थित पद्धतीने होत आहे. सर्व संगणकांमध्ये आता अधिक चांगल्या प्रकारची संरक्षण व्यवस्था बसविण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.