त्वरित सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार, आज याचिका तालिकेवर येण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देऊन त्यांचीच शिवसेना खरी असल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय सर्वथैव अयोग्य असून तो पक्षपाती आहे, असा मुद्दा ठाकरे यांनी आपल्या याचिकेत उपस्थित केला आहे.
ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सोमवारी याचिका सादर केली. मात्र ती त्वरित नोंद करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सिंघवी यांनी या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्याचा आग्रह धरला. तथापि, त्यांनी तो मानण्यास नकार दिला. आपण नियमाप्रमाणे याचिका सादर करा. उजव्या, डाव्या किंवा मधल्या कोणत्याही बाजूसाठी नियम सारखेच असतात. त्यामुळे उद्या याचिका सादर करण्याचा प्रयत्न करा. आम्ही तिच्यावर सुनावणी केव्हा करायची, हे त्यानंतर ठरवू, असे सरन्यायाधीशांनी सिंघवी यांना स्पष्टपणे सुनावले.
शक्या-शक्यतांचा खेळ
आज मंगळवारी ही याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर येईल का हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंबंधीच्या याचिकांवर मंगळवारीच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या याचिकांसमवेतच ही नवी याचिका जोडली जाईल का, असा प्रश्न आहे. तसेच आज मंगळवारीच या याचिकेवर सुनावणी करण्यात प्रारंभ करण्यात येईल का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच या सत्तासंघर्षासंबंधीच्या इतर याचिका बाजूला ठेवून आधी या अपील याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल का, हा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. ही याचिका हा ठाकरे यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.
शिवसेना जोरदार विरोध करणार
मुख्यमंत्री शिंदे यांचीं शिवसेना खरी ठरल्याने आता त्यांनी ठाकरे यांच्या याचिकेला जोरदार विरोध करण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे. शिवसेनेकडून ठाकरे यांच्या याचिकेच्या आधीच सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हिएट’ सादर करण्यात आले आहे. ठाकरे यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका सादर केली जाण्याची शक्यता आहे. ती सादर झाल्यास आम्हाला आमचा पक्ष मांडण्याची संधी देण्याआधी कोणताही आदेश अगर निर्णय दिला जाऊ नये, अशी विनंती या कॅव्हिएट आवेदनात करण्यात आली आहे.
ठाकरे यांचे मुद्दे
निवडणूक आयोगाने अयोग्य आणि असमतोल निर्णय दिला आहे. ठाकरे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांकडे लक्ष देण्यात आलेले नाही. ठाकरे यांनी त्यांच्या पाठिंब्याची लाखो प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. ती दुर्लक्षित करण्यात आली आहेत. शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेत ठाकरे यांचे बहुमत आहे, ही बाब दुर्लक्षित करण्यात आली. 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेत परिवर्तन करण्यात आले. ते निवडणूक आयोगाने अवैध ठरविले आहे. मात्र, याच घटनेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या गटाने नेतेपदी निवड केली होती. ती वैध कशी ठरविली गेली?, कोणत्या नियमांच्या अनुसार शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला देण्यात आले, असे अनेक मुद्दे ठाकरे यांच्या याचिकेत आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला त्वरित स्थगिती देण्यात येऊन हा निर्णय निष्प्रभ करण्यात यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
आज सुनावणी होईल का?
अनेक कायदेतज्ञांच्या मते या याचिकेवर त्वरित सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. कारण निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारच्या वतीने कॅव्हिएट सादर करण्यात आलेले आहे. त्यामुळे आधी महाराष्ट्र सरकारला नोटीस काढावी लागणार असून नंतर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल, अशी शक्यता आहे.
सत्तासंघर्षासंबंधी आजपासून सुनावणी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंबंधीच्या मुख्य मुद्दय़ांवरच्या सुनावणीला आज मंगळवारपासून प्रारंभ केला जाणार आहे. या सुनावणीसाठी 3 सलग दिवस राखून ठेवण्यात आले आहेत, असे समजते. ही सुनावणी सध्याच्याच पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणार आहे. या सुनावणीत प्रामुख्याने आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात युक्तिवाद केले जातील. तसेच नबाम रेबिया प्रकरणातील मुद्दय़ांवरही पुन्हा चर्चा केली जाईल. त्यानंतर हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवायचे की नाही, यासंबंधीचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून दिला जाईल.
पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे लक्ष
ड ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केल्याने उत्सुकता
ड याचिकेवर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय दिला जाणार
ड महाराष्ट्र सत्तासंघर्षातील इतर मुद्दय़ांवर आजपासून युक्तिवाद होणार