वृत्तसंस्था /रॉसेयू (डॉम्निका)
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने यजमान विंडीजचा बुधवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात 150 धावांत खुर्दा केला. दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने चोख प्रत्युत्तर देताना 55 षटकांत बिनबाद 146 धावा जमविल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 7 चौकारांसह 62 व रोहित शर्मा 6 चौकार, 2 षटकारांसह 68 धावांवर खेळत होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विंडीजचे फलंदाज भारताच्या दर्जेदार फिरकीसमोर सपशेल कोलमडले. अलीकडेच विंडीज संघाला भारतात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. दरम्यान विंडीजचा संघ या धक्क्यापासून अद्याप सावरलेला दिसत नाही. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी संघातून वगळल्याबद्दल नाराज झालेल्या रविचंद्रन अश्विनने पुन्हा भारतीय संघात आपले यशस्वी पुनरागमन केले. विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात पाच गडी बाद केले. कसोटीमध्ये एका डावात पाच बळी घेण्याची ही त्याची 33 वी खेप आहे. या कामगिरीमुळे अश्विनने आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या मानांकनातील मिळालेले आपले अग्रस्थान सार्थ ठरविले आहे.
या कसोटीत भारतातर्फे यशस्वी जैस्वालने आपले कसोटी पदार्पण केले. रॉसेयुच्या या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी अश्विनने आपल्या फिरकीचा प्रभाव दाखवला. चेंडू या खेळपट्टीवर बऱ्यापैकी उसळी घेत असला तरी फिरकीला ही खेळपट्टी संथगतीने साथ देत असल्याचे दिसू लागले. या सामन्यामध्ये मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि उनादकट या तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला. पहिल्या दिवशी अश्विनने तेजनारायण चंद्रपॉलला बाद करीत पिता व पुत्राला बाद करणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळविला. विंडीजच्या डावात अॅलिक अॅथनेझ याने 99 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह सर्वाधिक म्हणजे 47 तर कर्णधार ब्रेथवेटने 3 चौकारांसह 20, कॉर्नवॉलने 3 चौकारांसह नाबाद 19 धावा जमविल्या.
अश्विनचे असाही विक्रम,डावात पाच बळी घेणाऱ्यांच्या यादीत सहावा
जगातील दिग्गज फिरकीपटूंच्या यादीत गणला जाणारा भारतीय संघाचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन पुन्हा चमकला. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी त्याने शानदार गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, पाच बळी घेताच त्याच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये डावात सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अश्विन सहाव्या स्थानी पोहोचला आहे. कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. त्याने कारकीर्दीत 67 वेळा अशी कामगिरी केली आहे. तसेच, या यादीत सहभागी होणारा अश्विन दुसरा भारतीय आहे. त्याच्या पुढे दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे असून त्याने कसोटीत 35 वेळा ही कामगिरी केली आहे. दरम्यान, अश्विनने कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध पाचवेळा 5 बळी घेण्याची कामगिरी केली आहे. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 वेळा, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध 6 वेळा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 वेळा, श्रीलंकेविरुद्ध 3 वेळा, तसेच बांगलादेशविरुद्ध 1 वेळा असा पराक्रम केला आहे.
कसोटी डावात 5 विकेट्स सर्वाधिक वेळा घेणारे गोलंदाज
- 67 – मुथय्या मुरलीधरन
- 37 – शेन वॉर्न
- 36 – रिचर्ड हॅडली
- 35 – अनिल कुंबळे
- 34 – रंगना हेराथ
- 33 – आर अश्विन
- 32 – जेम्स अँडरसन
संक्षिप्त धावफलक
विंडीज प. डाव 64.3 षटकांत सर्वबाद 150 : ब्रेथवेट 46 चेंडूत 3 चौकारांसह 20, चंद्रपॉल 44 चेंडूत 12, रीफर 2, ब्लॅकवूड 34 चेंडूत एक चौकारासह 14, अॅथनेझ 99 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 47, होल्डर 1 चौकारांसह 18, कॉर्नवॉल 3 चौकारासह नाबाद 19, अवांतर 10. गोलंदाजी : अश्विन 5-60, ठाकुर 1-15, जडेजा 3-26, मोहम्मद सिराज 1-25). भारत प. डाव 23 षटकात बिनबाद 80 (जैस्वाल खेळत आहे 6 चौकारांसह 40, रोहित शर्मा खेळत आहे 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30, अवांतर 10.) (धावफलक पहिल्या दिवसाअखेर)