कंग्राळ गल्ली येथे दुपारी घडलेली घटना : परिसरात हळहळ व्यक्त
बेळगाव : खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून एका अडीच वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी दुपारी कंग्राळ गल्ली येथे ही घटना घडली. बालिकेच्या अकाली मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रात्री खडेबाजार पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. साईशा संदीप बडवाण्णाचे (वय अडीच वर्षे) रा. कंग्राळ गल्ली असे त्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. नळाला पाणी आल्यामुळे टाकीत पाणी भरण्यासाठी साईशाच्या आईने घरातील खोलीत असलेल्या टाकीचे झाकण उघडले होते. पाणी सोडून त्या आपल्या कामाला लागल्या होत्या. याच वेळेत खेळता खेळता बालिका पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचली आणि टाकीत पडली. दुपारी साईशाचे वडील घरी जेवायला आले. त्यांनी मुलगी कोठे आहे? अशी विचारणा केल्यानंतर परसात खेळत असणार म्हणून शोध घेण्यात आला. ती मिळाली नाही म्हणून संशयाने टाकीत डोकावले असता तिचे पाय दिसून आले. तातडीने पाण्याच्या टाकीबाहेर काढून या बालिकेला सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटलला नंतर खासगी इस्पितळात हलविण्यात आले. तेथे पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. तिच्या पश्चात आजी-आजोबा, आई-वडील, आत्या असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती.
महिन्याभरातील तिसरी घटना
पाण्याच्या टाकीत पडून लहान मुले दगावण्याची महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. 10 मे रोजी महांतेशनगर येथील एका नव्या बांधकामावरील पाण्याच्या टाकीत पडून प्रीतम राजू राठोड (वय 4 वर्षे) या बालकाचा मृत्यू झाला होता. 12 मे रोजी बेन्नाळी-होनगा येथील एका घराच्या आवारातील पाण्याच्या टाकीत पडून मुंबईहून पाहुण्यांकडे आलेला विहान संतराम सामाई (वय 3 वर्षे) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर 26 मे रोजी कंग्राळ गल्ली येथे ही घटना घडली आहे.