31 मार्च रोजी रामलीला मैदानावर महारॅली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात ‘इंडिया’ या विरोधी आघाडीने पुन्हा एकदा एकजूट दाखवली आहे. येत्या रविवारी म्हणजेच 31 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांकडून एक मेगा रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीच्या माध्यमातून विरोधकांना भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारविरोधात ताकद दाखवायची आहे.
‘इंडिया’च्या नेत्यांनी रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आंदोलन छेडण्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेदरम्यान दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशहाप्रमाणे वागत असल्याचा आरोप केला. त्यामुळेच 31 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रामलीला मैदानावर महारॅली काढणार आहेत. देशाचे पंतप्रधान केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. सध्या संपूर्ण विरोधकांना संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
इंडिया आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. ‘आप’च्या कार्यालयाचे पोलीस छावणीत रूपांतर झाले असून, त्यांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. काँग्रेस पक्षाचे खातेही सील करण्यात आले असून या कारणास्तव त्यांना प्रचार करता येत नाही. आज दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली जात असेल तर भविष्यात हे लोक काहीही करू शकतात, असा दावा गोपाल राय यांनी याप्रसंगी बोलताना केला.
महारॅली राजकीय नाही : अरविंदर सिंग लवली
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे दिल्ली युनिटचे प्रमुख अरविंदर सिंग लवली म्हणाले की, विरोधकांना समान संधी दिली जात नाही. काँग्रेसची खाती गोठवली आहेत. मुख्यमंत्र्यांना अटक केली जात आहे. यामुळेच 31 मार्चची मेगा रॅली राजकीय नसून देशाची लोकशाही वाचवण्याची आणि केंद्राच्या विरोधात आवाज उठवण्याची हाक आहे.
‘आप’ कार्यकर्ते रस्त्यावर
दुसरीकडे, केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दिल्लीतील सर्व विधानसभा मतदारसंघात निदर्शने केली. आयटीओ फूटओव्हर ब्रिजवर आप महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या आंदोलकांनी ‘मैं भी केजरीवाल’ असे बॅनर घेत केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना तत्काळ तेथून हटवले. त्यापूर्वी शनिवारी एक निवेदन जारी करत ‘आप’ने ‘भाजपची हुकूमशाही’ आणि मुख्यमंत्र्यांच्या ‘बेकायदेशीर अटके’विरोधात मेणबत्ती मोर्चा काढला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. मध्य दिल्लीतील भाजप मुख्यालय आणि ईडी कार्यालयाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दंगलविरोधी उपकरणांनी सज्ज असलेले निमलष्करी दलाचे जवानही तेथे तैनात करण्यात आले आहेत.